विधानपरिषद निवडणुकीचं बिगुल फुंकलं ; ‘या’तारखेला होणार मतदान
मुंबई | राज्यासह देशभरात कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला होता. कारण कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला आता 28 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. उद्धव ठाकरे 28 मे पर्यंत आमदार झाले नाहीत तर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात होती.
अशातच काही वेळापूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता ही निवडणूक 21 मे रोजी मुंबईत घेण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुका घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर योग्य प्रकारची खबरदारी घेवून ही निवडणूक घ्यावी, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. आमदारकीवरून राजकीय पेच निर्माण झाला असतानाच निवडणूक आयोगाने ही परवानगी दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.