राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध अत्यंत मधुर, पिता-पुत्राप्रमाणेच : संजय राऊत
![Shivsena Sanjay Raut says Dhananjay Munde issue is not affecting Mahavikasaghadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/sanjay-Raut-INTERVIEW.jpg)
मुंबई : “राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध मधुर आहेत. दोघांना एकमेकांविषयी आदर आणि आहे. दोघांचे संबंध पिता-पुत्रासारखे आहेत,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत यांनी आज राजभवनात जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. जवळपास 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सातत्याने राज्यपालांवर निशाणा साधत आहेत. त्यातच विरोधक आणि राज्यपालांच्या सतत होणाऱ्या भेटीवरुन ‘राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये’, अशी टीकाही त्यांनी केली होती. त्यानंतर आज संजय राऊत राजभवनावर पोहोचल्याने सगळ्यांच्याच नजरा या भेटीकडे लागल्या होत्या. परंतु ही सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राज्यपालांच्या भेटीविषयी संजय राऊत म्हणाले की, “राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. खूप दिवस त्यांना मी व्यक्तिश: भेटलो नव्हतो. ही केवळ सदिच्छा भेट होती. यापलिकडे काही नाही. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांविषयी प्रेम आणि आदर आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे संबंध जसे पिता-पुत्राचे असावेत तसेच आहेत. दऱ्या वगैरे आमच्यात पडत नाही.”
राज्यपाल अचानक प्रिय कसे झाले या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “राज्यपाल प्रियच असतात ते या राज्याचे पालक आहेत, घटनात्मक प्रमुख आहेत. विरोधक सतत इथे येतात त्यामुळे विरोधी पक्षनेत्याचं दालन किंवा बंगला राजभवन परिसरात असावं, असं अनेकांनी सांगितलं, याचा अर्थ ती राजभवनावर टीका होत नाही.