‘मोदी अकार्यक्षम पंतप्रधान, त्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही’; राहुल गांधींचे टीकास्त्र
![‘Modi is an incompetent Prime Minister, he doesn’t care about the farmers’; Rahul Gandhi's Tikastra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/rahul-gandhi-congress_201904215416.jpg)
नवी दिल्ली |
मागील एक महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेत दोन कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर केले आहे.
कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी काँग्रेसकडून केलेली जात आहे. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. नरेंद्र मोदी अकार्यक्षम पतंप्रधान असून, त्यांना शेतकऱ्यांची काळजी नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
दिल्लीच्या वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांची पंतप्रधानांना काळजी नसून ते अत्यंत अकार्यक्षम आहेत. तीन-चार कुडमुडय़ा भांडवलदारांच्या आधारे मोदी देश चालवत असून त्यांच्यासाठी पैसे उभे करण्यात गुंतलेले आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. कोणतीही चर्चा न करता संमत केलेले कायदे रद्द झाले पाहिजेत. अन्यथा दिल्लीच्या सीमांवरील आंदोलक शेतकरी मागे फिरणार नाहीत. ते वैतागून, त्रासून घरी जातील असे मोदींना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम असेल, असा इशारा देखील राहुल गांधींनी सरकारला दिलेला आहे.