मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली- देवेंद्र फडणवीस
मुंबई |
राजा उदार नव्हे तर उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला, अशी परिस्थिती आजच्या सरकारमध्ये पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले, अशी टीका विधान परिषदेतेली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे आज भाजपचा शेतकरी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात फडणवीस बोलत होते.
या वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. ते मोठमोठ्या घोषणा करत होते. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पैसैे देताना कमी पैसे कसले देता शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 हजार रुपये द्यायला पाहिजे असे जाहीर केले. परंतू, अजितदादा तर त्याहीपेक्षा वर निघाले. त्यांनी तर म्हटले की, काय सांगता… उद्धव ठाकरे आपण तर म्हणता आहात 50,000 काय म्हणता? बागायतदार शेतकऱ्यांना तर 1,50,000 लाख रुपये मदत मिळायला हवी.
अजितदादांचे वक्तव्य ऐकून ते आम्हाला शेतकऱ्यांचे कैवारीच वाटले. पण कसले काय कुठले 50 हजार आणि कुठले 25 हजार शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही. राजा उदार नव्हे.. उधार झाला आणि शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला अशी स्थिती या सरकारमध्ये पाहायला मिळत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
या वेळी फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली. गेल्या पाच वर्षामध्ये साखरेच्या अर्थकारणामध्ये जे काही निर्णय झाले आहेत ते या आधी कधीही झाले नाहीत. हे निर्णय केवळ मोदी सरकारनेच करुन दाखवले. मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. केवळ आम्ही जी प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली होती. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. मात्र, शेतकऱ्याचे जे नुकसान झाले त्याबाबत एक नया पैसाही मिळाला नाही, असे फडणवीस म्हणाले.