मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीसांत तक्रार दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Uddhav_PTI.jpg)
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आम आदमी पार्टीकडून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक 2019 वेळी जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्यात शिवसेनेने मोठी अश्वासने दिली होती. तसेच, ही अश्वासने राज्याच्या तिजोरीचा विचार करुनच दिली असल्याचे त्यावेळी सांगिण्यात आले होते. मात्र, असे असतानाही दिलेल्या वचननाम्यातील एकही वचन पूर्ण झाले नाही, असा आरोप करत आम आदमी पक्षाने पोलिसांत तक्रार दिली आहे.
शिवसेना वचननाम्यात म्हटले आहे की, ‘घरगुती वापरातील वीज दर 300 युनिट पर्यंत 30 टक्क्यांनी कमी करणार’ असे अश्वासन आहे. परंतू, प्रत्यक्षात मात्र ही वचनपूर्ती झालीच नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेची फसवणूक झाली आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. तसेच, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेत तक्रार दिली आहे.
आम आदमी पक्षाने म्हटले आहे की, शिवसेनेच्या वचननाम्यावर विश्वास ठेऊन जनतेने शिवसेनेचे 56 उमेदवार निवडूण दिले. त्याच्या जोरावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करणे ही उद्धव ठाकरे यांची राजकीय आणि नैतिक जवाबदारी होती. परंतू, प्रत्यक्षत तसे न घडता त्यांनी जनतेची फसवणूकच केली आहे, असे आपचे म्हणने आहे.
आपल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात गुन्हा नोंद झाला आहे किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही. राज्यात कोरोना व्हायरस महामारिचे संकट आहे. या संकट काळातही राज्य सरकारने 1 एप्रिल 2020 पासून वीज दरवाढ कायम ठेवली आहे. वीजनिर्मितीचा दर प्रती युनीट 3 रुपये इतका आहे. असेअसताना राज्यातील जनतेला मात्र हीच वीज प्रती युनीट 15 रुपये दराने मिळत आहे. एकप्रकारे ही जनतेची लूटच असल्याचा आम आदमी पक्षाचा दावा आहे.