देशावर मोठं संकट! देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये- शरद पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/download-3.jpeg)
नाशिक: कोरोनाच्या संकट काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं राजकारण करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिलेला आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. तेव्हा शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, आतापर्यंत दाखवला तसाच संयम मुस्लिम समाजाने बकरी ईदला दाखवावा, असं आवाहन पवारांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे कोरोनाच्या कामाला वाहून घेतल्याचं सांगत पवारांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक देखील केलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज (24 जुलै) नाशिक दौऱ्यावर होते. दुपारच्या सत्रात पवार यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना कोरोना संदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पवार यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शहरामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेड उपलब्ध करून देणे तसेच जास्तीत जास्त टेस्टिंग करणे महत्त्वाचे असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री कोरोनाच्या संकटात पूर्ण काम करत आहेत, असं सांगत पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. आम्ही फिल्डवर जाऊन परिस्थिती बघून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. त्यानंतर धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत, असं देखील पवारांनी स्पष्ट केलं आहे. नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ असल्याने डॉक्टर्सची कमतरता भासणार नाही, मात्र जर डॉक्टर्स टाळाटाळ करत असतील. तर मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा देखील पवार यांनी दिला आहे. दरम्यान, लॉकडाऊनबाबत माझी काहीही भूमिका नाहीये. त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे.