तिकीट का कापले माहीत नाही; पक्षाने कारण सांगितले नाही – विनोद तावडे
महा ई न्यूज | मुंबई : भाजपाचे नेते विनोद तावडे यांचे पक्षाने तिकीट कापले आहे. त्यांच्याऐवजी सुनील राणे यांना बोरिवली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर विनोद तावडेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 1985पासून मी पक्षाचे काम करतो. मला उमेदवारी का नाही यात माझी काही चूक की पक्षाची काही चूक झाली, याचे विश्लेषण करण्याची ही वेळ नाही. मी अमित शाहांशी यासंदर्भात नक्कीच चर्चा करेन.
मी संघाच्या शिस्तीनं विद्यार्थी दशेत काम करत आलो आहे. राजकीय क्षेत्रात काम करताना बऱ्याचदा मानसिकता बदलावी लागते. संघाला आणि विद्यार्थी परिषदेला अभिप्रेत असलेल्या दृष्टीनं माझं काम सुरूच आहे. राष्ट्र निर्माणाच्या कार्यात जे जे येईल ते गंतव्य स्थानापर्यंत घेत जायचं आहे. मी विरोधी पक्षनेता झालो, त्यानंतर मंत्री झालो. बरेच जण आमदार पण नाहीत आणि मंत्री पण नाहीत तरीही पक्षाचं काम करतायत. संघाच्या विद्यार्थी परिषदेत असल्यापासून समाजाच्या हिताचं काम करण्याची शिकवण नेहमीच दिली गेली आहे. मला उमेदवारी न देण्याची काही कारणं नक्कीच असतील, पण निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष नेतृत्वाशी बोलता आलेले नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्वावर काही वेळा विश्वास ठेवावा लागतो. पाच वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराची एकही गोष्ट नाही. पक्षनेतृत्व जे निर्णय घेतं, त्याची चर्चा होतच असते. पण मी काम करणं थांबवणार नाही. मी संघ आणि भाजपाला अभिप्रेत असलेलंच काम सुरूच ठेवेन. चुकलं असलं तरी पक्ष पुन्हा संधी देईल, अशी आशा असल्याचंही तावडे म्हणाले आहेत.