”ओठास लाली व तोंडास पावडर लावून बसलेल्यांनी आता खिडकीही बंद करावी”- शिवसेना
मुंबई | महाईन्यूज
हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांना काँग्रेसबरोबर जाण्याचा शब्द दिला होता का, असा प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उद्धव ठाकरेंनीही उत्तर देताना भाजपाची पालखी कायम वाहणार नसल्याचा बाळासाहेबांना शब्द दिल्याची आठवण करून दिलेली होती. त्यानंतरही देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये शाब्दिक चकमक रंगलेली पाहायला मिळाली आहे. शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामन्याच्या अग्रलेखातूनही भाजपाला याच मुद्द्यावरून लक्ष्य करण्यात आलेलं आहे.
2019मध्ये देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही आणि महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली आहे. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी. शिवसेनेने स्पष्टच केले. आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचेही तसे ओझेच होते. तेही उतरले, असं म्हणत भाजपासोबत उरलंसुरलेलं नातंही संपुष्टात आणल्याचे सूतोवाच केले आहेत.