एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज नाही मग खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची अट का?
एसटीऐवजी खासगी वाहनाने जर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास ई-पास बंधनकारक असणार आहे. एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज नाही मग खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पासची अट कशासाठी, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
केंद्र सरकारने राज्यांतर्गंत वाहतुकीवरील निर्बंध हटवल्यानंतर महाराष्ट्रातही ई-पासची अट हटवण्यात यावी याबाबत सातत्याने मागणी होत होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यभर एसटी सेवा सुरू करताना, एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी ई-पासची गरज नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र खासगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाताना ई-पास बंधनकारक असल्याचंही स्पष्ट केलं होतं. याबाबत मोठ्या प्रमाणावर सर्व सामान्यांच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्यामुळं सरकारनं या निर्णयाचा फेरविचार केला आहे.
याबाबत अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘केंद्र सरकारने वाहतुकीबाबत काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. आपण काही काळ निर्बंध कमी केले. मात्र, त्यानंतर ग्रामीण भागात करोनाचा प्रसार वाढला. सुरुवातीला ३ महिने ग्रामीण भागात करोनाचा प्रसार नव्हता, मात्र, निर्बंध शिथील केल्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढले. त्यामुळं सध्या महाराष्ट्रात ई-पासबाबत आहे तेच नियम राहतील. काही दिवसांनी यावर पुनर्विचार केला जाईल,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. यानुसार केंद्र सरकारने राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध उठवले आहेत. खासगी वाहनं आणि मालवाहतुकीवरील निर्बंध हटवल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं.