एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवल्यानं महाविकास आघाडीत बिनसलेलं चित्र…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-108.png)
कोरोगाव भिमा तपासावरुन महाविकास आघाडीत असलेले मतभेद वारंवार समोर येत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटीच्या चौकशीची केलेली मागणी, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याच्या निर्णयाला दिलेल्या मंजुरीमुळे महाविकास आघाडीत काहीतरी नक्कीच बिनसलं आहे… यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाच्या समांतर चौकशीचे संकेत दिले आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/download-1.jpg)
एल्गार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे. मात्र हा तपास राज्य सरकारनं एसआयटीच्या माध्यमातून करावा, अशी आग्रही मागणी शरद पवारांनी आधीच केली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवल्यानं शरद पवारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. केंद्राचा निर्णय अयोग्य असून मुख्यमंत्र्यांनी त्याला दिलेली मंजुरी त्याहूनही अयोग्य असल्याचं पवार म्हणाले होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-109.png)
यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा समांतर तपास केला जाऊ शकतो का, याबद्दल कायदेशीर सल्ला घेत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. गृह मंत्रालयाकडून या प्रकरणी एसआयटी स्थापन केली जाऊ शकते, याचे संकेत देशमुख यांनी दिले आहेत.