उदयनराजेंच्या शपथविधीच्या वादावर व्यंकय्या नायडूंनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…
मुंबई: राज्यसभा खासदारांनी काल (22 जुलै) शपथ घेतली आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सर्व खासदारांना सदस्यत्वाची शपथ दिली होती. यावेळी भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली होती. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली होती. ‘तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ असं व्यंकय्या नायडू म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याच्या विरोधात मोठा वाद निर्माण झालेला आहे. आता यावर राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी यावरील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
Always been a strong and vocal admirer of Chhatrapati Shivaji Maharaj and worshipper of Goddess Bhawani.
— M Venkaiah Naidu (@MVenkaiahNaidu) July 23, 2020
Reminded Members that as per conventional practice at the time of taking oath, no slogans are given.
No disrespect at all.
राज्यसभा सदस्यांच्या शपथविधीच्या वेळी उदयनराजेंच्या जय भवानी जय शिवाजी या उद्घोषावर आक्षेप घेतल्यावरुन राज्यात तीव्र संतापाची लाट दिसून आलेली आहे. अनेक ठिकाणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली आहे. परंतु, आता स्वतः व्यंकय्या नायडू यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि देवी भवानीचा उपासकही आहे. परंतु, सभागृहात शपथ घेताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा दिल्या जात नाहीत, याचीच मी सभागृहाच्या सदस्यांना आठवण करून दिलेली आहे. यातून
कोणताच अनादर केला नाही’, असं ट्वीट व्यंकय्या नायडू यांनी केलेलं आहे.