अजित दादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख, त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार: जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुंबई: “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमच्या कुटूंबाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबातील प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार आहे. त्यात वावगं असं काहीही नाहीय. त्यामुळे याबाबत अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाहीय”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलेली आहे.
पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केलेली होती. त्यावर भाष्य करताना शरद पवार यांनी पार्थ पवारांवर टीका केली आहे. “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर नातवाला फटकारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पार्थ यांची पाठराखण केलेली आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात याविषयावर विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान, पार्थ पवारांवर टीका केल्यानंतर शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे.
सिल्व्हर ओक’वरील बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेलेले आहेत. दरम्यान, पार्थ पवारांवरील टीकेवर अजित पवार नाराज नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. “आमची सिल्व्हर ओकवर ठरलेली बैठक होती. पार्थ संबंधित कोणताही विषय चर्चेत आला नाही. पार्थ यांचं विधान त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण याबाबत कोणताही कौटुंबिक वाद नाही. पवार कुटुंबात कोणतेही वाद नाहीत”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.