अखेर इंदू मिलच्या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकरांना वादावर पडदा टाकत निमंत्रण
मुंबई: मुंबईतील दादर परिसरात इंदु मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, या कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर यांनाच निमंत्रण न दिल्यामुळे वाद पेटलेला होता. अखेर या वादावर पडदा टाकत ऐनवेळी आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदु मिलमध्ये भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्याक्रम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. परंतु, या कार्यक्रमाला मोजक्यात 16 जणांना बोलावण्यात आलेले आहे. पण, इंदु मिलसाठी आंदोलन करणारे आनंदराज आंबेडकर यानांही आमंत्रित करण्यात आलेलं नव्हते.
आनंदराज यांच्या मोठ्या आंदोलनानंतर सरकारने ही जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिलेली आहे. मोठं आंदोलन करत इंदू मिलचे दरवाजे आणि पोलिसांचा मोठा ताफा फोडत आंदोलन केलेलं होतं. सरकारने बाबासाहेबांच्या कुटुंबातील सदस्यांनाच आमंत्रित न केल्यामुळे तीव्र नाराजी उमटलेली होती. अखेर 11.30 वाजेच्या सुमारास एमएमआरडीएकडून एक पत्रक प्रसिद्ध करून आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. ‘आपण स्मारकाच्या कामाचा दर्जेवर प्रश्न उपस्थितीत केलेले होते. त्यामुळे मला न बोलवण्याचा प्रयत्न होता. पण आता सरकारकडून निमंत्रण मिळालेले आहे. आपण या कार्यक्रमाला जाणार असून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास निकृष्ट कामाची बाजू मांडणार आहोत, असं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलेले आहे.