शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला – शरद पवार
![With the demise of Shivshahir Babasaheb Purandare, Maharashtra lost its literary and artistic heritage - Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/Sachin-Tendulkar-Babasaheb-Purandare.jpg)
नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही अर्पण केली श्रद्धांजली
पुणे | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शिवशाहीर पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुरंदरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.खासदार शरद पवार हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहताना म्हणतात की, ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.’ असे त्यांनी ट्वीट केले आहे.
एका दिव्य दृष्टीच्या दिग्दर्शक, अभिनेता, कलावंत, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता आणि सर्वस्पर्शी अशा व्यक्तिमत्त्वास आज महाराष्ट्र मुकला आहे. अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे. वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारेच नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते, असे गडकरी यांनी म्हटले आहे.विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने अतिशय वेदना झाल्याचे म्हटले आहे. ‘प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत.’
तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच! नुकतेच त्यांचे 100 व्या वर्षात पदार्पण झाले, तेव्हा त्या सोहोळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा योग आला आणि आज ते आपल्यात नाहीत. विश्वासच बसत नाही.बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’सारखा चरित्रात्मक ग्रंथ,‘जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा आहे, असे फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस यांच्या ट्वीटमध्ये शेवटी म्हणतात की, ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शान्ति!खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत.’ असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.याशिवाय सामाजिक क्षेत्रातील, सिने क्षेत्रातील कलाकार तसेच क्षेत्रातील अनेकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.