Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीएमआरडीएचा डीपी का रद्द केला? अजित पवार म्हणाले, बिल्डरांना…

पिंपरी : पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चा विकास आराखडा करताना बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांच्या जागा वगळण्यात आल्या. गोरगरिबांच्या जमिनींवर आरक्षण टाकली आहेत. अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विकास आराखडा रद्द केल्याची माहिती उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. नवीन आराखड्यात रस्ते, परवडतील अशा घरांचे आरक्षण टाकले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) वतीने चऱ्होली आणि माण येथे सुरू करण्यात आलेल्या नवीन ई- बस स्थानकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शुक्रवारी चऱ्होलीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार बापू पठारे, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा –  स्वातंत्र्यसैनिकांबाबत बेजबाबदार विधाने नको; सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

अजित पवार म्हणाले, चऱ्होली डेपोला ६० आणि माणला ३० बस देण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे महापालिका ६० आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ४० टक्के हिस्सा दिला जात आहे. पीएमपीएमएलसाठी नवीन २३० कोटींच्या टाटाच्या ५०० बस घेणार आहोत. यासाठी पीएमआरडीने पीएमपीएमएलकडे निधी दिला आहे. सोबतच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणखी निधी पुरवेल. म्हणजे जवळपास दीड हजार बस ताफ्यात असतील. जेणेकरून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बऱ्यापैकी प्रश्न सुटेल. सण २०४१ मध्ये पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ही ६१ लाखांच्या घरात जाईल. कदाचित येत्या लोकसभेत पिंपरी-चिंचवडचा स्वतंत्र खासदार होईल. वाढती लोकसंख्या पाहता त्या पध्दतीने सगळे नियोजन करत आहोत. शहरासाठी भामा, आसखेड, ठोकरवाडी, मुळशी, पवना धरणातून पाणी आणले जाणार आहे.

ई-बस वातानुकूलित (एसी) आहेत. सीएनजी बस वातानुकूलित करण्यासाठी किती खर्च येतो. याची माहिती घ्यावी. उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. उष्माघाताचा अनेकांना त्रास होत आहे. अशात श्रीमंत तर एसीमध्ये फिरू शकतात. पण, सर्वसामान्य नागरिकाला एसीत बसून प्रवास करता यावा. यासाठी सीएनजी बसही एसी करण्याची सुचना पवार यांनी केली.

मी वरचेवर भेटत नसलो, शहरात जास्त येत नसलो, तरी पुण्याचा पालकमंत्री म्हणून जनतेच्या हितासाठी काम करत आहे. मुंबई, पुण्यात बसून पिंपरी- चिंचवडकरांच्या हिताचे निर्णय घेत आहे, असेही ते म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button