आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची यशस्वी मध्यस्थी
![Sweepers' agitation postponed after written assurance of Commissioner; Successful mediation of NCP city president Ajit Gawhane](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220309-WA0023-1.jpg)
पिंपरी चिंचवड | 7 मार्चपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर महिला सफाई कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. 12 प्रकारच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या पैकी 11 मागण्या मान्य झाल्या असून आयुक्त राजेश पाटील यांनी लेखी दिले आहे. त्यामुळे गेल्या दिवसांपासून सुरू असलेले महिला सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित झाले असल्याची माहिती कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी यशस्वी मध्यस्थी केली.
महापालिकांतर्गत सफाई करण्याचे काम ठेकेदारांना दिले आहे. हे ठेकेदार मनमानी पद्धतीने महिला सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. ठेकेदारांच्या या मनमानिविरोधात महिला सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर ठिय्या मांडत आंदोलन छेडले. तीन दिवस आंदोलन केल्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांच्या सोबत बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे देखील या वेळी उपस्थित होते. या वेळी 11 मागण्या मान्य करण्यात आल्याचे लेखी आयुक्तांनी दिले.
या मागण्यांमध्ये सर्व सफाई कामगार महिला, पुरुष पैकी कोणालाही कंत्राटी कामगारांना नवीन ठेकेदार कामावरून कमी करू नये. अर्ध वेळ कामास घेतल्यास पुढील दिवसाचा किमान वेतन प्रमाणे पगार द्यावा. कंत्राटी कामगारांना कामाच्या ठिकाणी जास्त कामे व अतिरिक्त कामे, मातीचा ढीग उचलणे हाताने, मैला उचलने व इतर अतिरिक्त कामे सांगण्यात येऊ नयेत. सफाई कंत्राटी कामगार महिलांना कामाच्या ठिकाणी होणारे शोषण, पिळवणूक थांबून कामाच्या ठिकाणी मोकळेपणा मिळाला पाहिजे. मागील वर्षाचे बोनस देण्यात यावे सफाई कामगाराचे बोनस थकित 18 ते 21 थकित बोनस देण्यात यावे. सफाई कामगारांना मनपाने कायमस्वरूपी कामावर घ्यावे. कंत्राटी पद्धत बंद करा. नवी मुंबईच्या धरतीवर सफाई कामगारांना घरकुल योजना राबविण्यात यावी. सफाई कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी आदींचा समावेश होता. दिलेल्या लेखी आश्वासनांची लवकर अंमलबजावणी न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा कांबळे यांनी दिला.