स्थायी समिती लाचप्रकरणाचे धागेदोरे राज्यातील बड्या नेत्यांपर्यंत असू शकतात – अण्णा बनसोडे
![Standing Committee Bribery case can be traced back to big leaders in the state - Anna Bansode](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/1073056_206296912883907_1229135585_o.jpg)
- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस
पिंपरी- ना खाऊंगा ना खाने दुंगा हे उद्घोषक वाक्य देऊन सत्तेत आलेल्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला असल्याने थोडी नैतिकता शिल्लक असेल तर भाजपा नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा द्यावा. ताब्यात असलेले कर्मचारी, पदाधिकारी यांच्यामागे नेमका कुणाचा आधार होता हे शोधणे गरजेचे असून याचे धागेदोरे राज्यातील बड्या नेत्यांपर्यंत असू शकतात अशी शंका उपस्थित करत या प्रकाराची सर्वांगीण सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी राज्य शासनाकडे केली असल्याचे पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.
महापालिकेचे आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयावर (बुधवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ‘एसीबी’ने धाड टाकली. चौकशीअंती सभापती अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक चालक), अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 24 वर्षीय ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत अँटी करप्शन विभागामार्फत कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस असून ना खाऊंगा ना खाने दुंगा हे उद्घोषक वाक्य देऊन सत्तेत आलेल्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला असल्याने थोडी नैतिकता शिल्लक असेल तर भाजपा नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा द्यावा. तसेच घडलेल्या प्रकाराची सर्वांगीण सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मी राज्य शासनाकडे केली आहे. ताब्यात घेतलेले अधिकारी पदाधिकारी यांच्यामागे नेमका कुणाचा आधार होता हे शोधणे गरजेचे असून याचे धागेदोरे राज्यातील बड्या नेत्यांपर्यंत असू शकतात.
चौकशीअंती लवकरच सत्य बाहेर येईल; घोषणांचा पाऊस पाडून सत्तेत आलेल्या भाजपाने पदाचा गैरवापर करून शहरातील जनतेच्या पैशाची जी लूट चालवली होती. याचा पुरावा आज शहरातील जनतेला मिळाला आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा या लोकांनी घात केल्याचे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. खोटे बोलून सत्ता पदरात पाडून घेतलेल्या या लोकांमुळे सर्व बाजूंनी शहरातील जनतेचा भ्रमनिरास झाला असून, धाडस दाखवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे व लाचलुचपत विभागाचे मी कौतुक करतो, असेही बनसोडे म्हणाले.