पिंपरीगाव प्रभागातील पाणी प्रश्न तत्काळ सोडवा; संदीप वाघेरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
![Solve water problem in Pimpri-Chinchwad ward immediately; Demand of Sandeep Waghere to Municipal Commissioner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/पिंपरीगाव-प्रभागातील-पाणी-प्रश्न-तत्काळ-सोडवा-संदीप-वाघेरे-यांची-महापालिका.jpg)
पिंपरी : पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मध्ये पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेले आहे. त्यामुळे प्रभागातील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पाणी प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा अशी मागणी आयुक्त राजेश पाटील यांचे कडे केली आहे.
या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, पिंपरी प्रभाग क्र.२१ मधील वारंवार विस्कळीत होत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय घेणे अपेक्षित आहे. एम.आय.डी.सी. च्या वतीने भक्ती शक्ती चौक निगडी ते दापोडी पर्यंतच्या जुना मुंबई –पुणे महामार्गावर जी पाण्याची लाईन टाकण्यात आलेली आहे, त्या लाईन द्वारे रस्टन,आनंदनगर व नाणेकर चाळ,एच.ए.मिलेट्री डेअरी फार्म,अल्फा लावल, SANDVIK यासारख्या कंपन्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.
प्रभाग क्रमांक २१ मधील नव महाराष्ट्र विद्यालय येथील जुनी ५ लक्ष लिटर क्षमतेची पिण्याची पाण्याची टाकी पाडून त्या ठिकाणी १० लक्ष लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यात येणार असून सदर ठिकाणी ५ लक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा करावा लागणार आहे. तसेच प्रभागामध्ये म्हाडा गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत सुमारे १२०० सदनिका बांधण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने सुयोग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत एम.आय.डी.सी. च्या लाईनवरून मिलेट्री डेअरी फार्म मार्गे नवीन लाईन नव महाराष्ट्र विद्यालय पाण्याच्या टाकिस लाईन जोडल्यास पाणी प्रश्न संपुष्टात येणार आहे.
पाणीपुरवठा विभागामार्फत एम. आय.डी.सी. च्या लाईनवरून मिलेट्री डेअरी फार्म मार्गे नवीन लाईन नवमहाराष्ट्र विद्यालय पाण्याच्या टाकिस लाईन जोडून देण्यात यावी अशी आग्रही मागणी संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचेकडे केली आहे.