सीमाताई सावळे यांना अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने “समाज मित्र” पुरस्कार प्रदान
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा – सीमाताई सावळे
![Seematai Savle, Anna Bhau Sathe, Jayanti, "Samaj Mitra", Awards, Sahitya Ratna, Loktantrik, Annabhau Sathe, Bharat Ratna, Seematai Savle,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/pimpari-19-780x470.jpg)
पिंपरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिका व उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते, यावेळी मातंग समाजाच्या वतीने देण्यात येणारा महत्वपुर्ण असा “समाज मित्र” पुरस्कार यावेळी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि डॅशिंग माजी नगरसेविका सीमाताई सावळे यांना समाजाच्या वतीने प्रदान कऱण्यात आला. यावेळी बोलताना सीमाताई सावळे यांनी, केंद्र सरकारने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना देशातील सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे यासाठी आपण पाठपुरावा कऱणार असल्याचे सांगितले.
मातंग समाजाच्या वतीने समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे यांनी सीमाताई सावळे यांचे स्वागत करत समाजाबद्दल सावळे यांनी घेतलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही यावेळी दिली. मातंग समाजाचे राज्यातील युवा कार्यकर्ते आणि नवनिर्वाचीत आमदार अमित गोरखे यांच्याबद्दल सीमाताई सावळे यांनी गौरवोद्गार काढले. अल्पवयात इतकी मोठी भरारी घेणारे आमदार अमित गोरखे हे समाजासाठी आदर्श असल्याचे त्यांनी म्हटले.
मातंग समाजाला वेळोवेळी सहकार्य करून समाजाच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या सीमा सावळे यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षा असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाच्या निधीत भरघोस वाढ करत समाजहिताची भुमिका घेतली. वेळोवेळी अडचणीच्या काळी समाजाच्या सुख दुःखात सक्रिय सहभाग घेतला. समाजातील नवीन पिढीला दिशा देण्याची भूमिका घेतली. मातंग समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून समाज मित्र पुरस्कार प्रदान कऱण्यात आल्याचे महोत्सव समितीतर्फे भाऊसाहेब अडागळे यांनी सांगितले.
यावेळी मातंग समाजाचे व विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे, जेष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, खंडोबा देवस्थान जेजुरीचे विश्वस्त अनिल सौंदडे, मा.नगरसेविका आशाताई शेंडगे, शहराचे नेते सारंग कामतेकर, सुलतान चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश कांबीकर, भाजप अनुसूचित मोर्चाचे मनोज तोरडमल, मातंग समाजाचे जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप, सचिव बाबासाहेब रसाळ, उद्योजक बापु घोलप, नानासाहेब कसबे, शिवाजीराव साळवे, भगवान शिंदे, प्रा.धनंजय भिसे, किशोर हातागळे रामेश्वर बावणे, दत्तू चव्हाण, अरुण जोगदंड, संजय ससाणे, केसरताई लांडगे, आशाताई शहाणे, गणेश अवघडे, सतीश भवाळ आदी मान्यवर उपस्थित होते.