breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

Promising news: पिंपरी-चिंचवडला जलस्वयंपूर्ण बनवण्याची संकल्पपूर्ती!

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी साधला नागरिकांशी संवाद : आंद्रा भामा आसखेडचा दुसरा टप्पा जून-२०२५ पर्यंत पूर्ण होणार

पिंपरी : भविष्यातील २०४१ मधील संभाव्य लोकसंख्या गृहित धरुन शहराला पाणी पुरवठ्याचे स्त्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत. आंद्रा भामा आसखेड प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात १०० एमएलडी पाणी शहरात दाखल झाले. आता दुसऱ्या टप्प्याचे काम जून- २०२५ पर्यंत पूर्ण होईल. त्याद्वारे १६८ एमएलडी पाणी मिळणार आहे.  पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश रद्द केला आहे. निगडी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवली आहे. समाविष्ट गावांतील विविध ठिकाणी जलकुंभ आणि नवीन जलवाहिनीचे काम सातत्त्याने सुरू आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात मुळशी धरणातून ७६० एमएलडी पाणी आरक्षीत करावे. या करिता राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली.

भोसरी विधानसभा मतदार संघातील आमदार महेश लांडगे यांनी ‘जलस्वयंपूर्ण पिंपरी-चिंचवड’ या मुद्यावर पिंपरी-चिंचवडकरांशी  ‘सोशल मीडिया’द्वारे संवाद साधला.

आमदार लांडगे म्हणाले की, महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यासोबत वेगाने विकसित होणारे आपले पिंपरी-चिंचवड शहर. महाराष्ट्रातील सर्वात मोठे ५ व्या क्रमांकाचे आणि देशातील १९ व्या क्रमांकाचे शहर आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा ‘मिनी इंडिया’ असलेले आपले शहर ‘स्मार्ट सिटी’ आणि  आता मेट्रो सिटी म्हणून ओळखले जात आहे, ही निश्चितच पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

सुरूवातीला पिंपरी-चिंचवड नगरपरिषदेची स्थापना दि. ४ मार्च १९७० रोजी झाली. त्यानंतर दि. ११ ऑक्टोबर १९८२ रोजी महानगरपालिका स्थापन झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या अवघी २ लाख ३५ हजारांच्या घरात होती. गेल्या ४२ वर्षांमध्ये शहराची लोकसंख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. या काळामध्ये शहराची हद्दवाढ १९८२ आणि १९९७ अशी दोनवेळा झाली. पण, त्या तुलनेत जलस्त्रोत निर्माण झाले नाहीत.

पिंपरी-चिंचवडकरांची साथ मिळाली…

शहराच्या स्थापनेपासून पवना धरण हा एकमेव जलस्त्रोत होता. वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण यामुळे नवीन जलस्त्रोतांची निर्मिती करणे काळाची गरज होती. अन्यथा शहरात पाणी संकट उभा राहिले असते. किंबहुना आजही समाविष्ट गावांतील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी समस्या आहे. त्यामुळेच ‘‘पिंपरी-चिंचवडचा पाणीप्रश्न सोडवू’’ असे आश्वासन देत आम्ही २०१४ मध्ये भोसरी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निश्चय केला. मतदार संघातील सूज्ञ पिंपरी-चिंचवडकरांनी साथ दिली आणि मला आपला प्रतिनिधी म्हणून विधिमंडळ सभागृहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे आम्ही आंद्रा, भामा-आसखेड पाणी पुरवठा प्रकल्प हाती घेतला. त्याद्वारे २६८ एमएलडी पाणी भोसरी मतदार संघातील तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली या भागातील नागरिकांसाठी आरक्षीत करण्यात आले आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाचे ध्येय…

आंद्रा-भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेंतर्गत तळवडे येथे १०० एमएलडी जॅकवेल उभा करणे. तसेच, तळवडे ते चिखली जलशुद्धीकरण केंद्र, १०० एमएलडी पाणी पुरवठा वाहिनी, १०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र असे प्रकल्प कार्यान्वीत झाले आहेत. १६८ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राची ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आली आहे. आता भामा- आसखेड प्रकल्पातील धरणामध्ये बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलचे काम व थेट पाईपलाईनने पाणी पुरवठा करणे हे काम प्रगतीपथावर असून, जून २०२५ पर्यंत भामा आसखेड  प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वयीत होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला जलस्त्रोतांमध्ये ‘‘आत्मनिर्भर’’ करण्यासाठी आणि शहराच्या शाश्वत विकासासाठी मी अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आलो आहे. विकास ही निरंतर प्रक्रिया आहे, अशी माझी भावना आहे. या पुढील काळात आपल्या साथीने आणि आशिर्वादाने ‘‘जल स्वयंपूर्ण पिंपरी-चिंचवड’’ चे ध्येय निश्चितपणे साध्य करेन, असा विश्वास देतो. ‘‘देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो…’’ या विचाराने आजवर काम करीत आलो आहे, यापुढेही करीत राहीन, असा ‘शब्द’ही आमदार महेश लांडगे यांनी यावेळी पिंपरी-चिंचवडकरांना दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button