गुणगौरव आणि कौतुकाने यशाचे शिखर गाठण्याची प्रेरणा मिळते: अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप
![Praise and appreciation inspire to reach the pinnacle of success: Additional Commissioner Ulhas Jagtap](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/गुणगौरव-आणि-कौतुकाने-यशाचे-शिखर-गाठण्याची-प्रेरणा-मिळते-–-अतिरिक्त.jpg)
पिंपरी : प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशामागे त्याने केलेल्या खडतर परिश्रमाचा इतिहास असतो. यशस्वी व्यक्तींच्या परीश्रमाची दखल घेऊन त्यांच्या यशाचे गुणगौरव आणि कौतुक केल्याने इतरांना यशाचे शिखर गाठण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वामध्ये शहरातील तसेच महापालिकेच्या अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान आज महापालिकेच्या वतीने करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रबोधन पर्वाचे संयोजक चंद्रशेखर कदम, विजय कांबळे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, निवृत्त अभियंता अनिल सूर्यवंशी, मंत्रालयातील नारायण डोळस, ग्रंथपाल प्रमुख रेखा गवळी, ग्रंथपाल दिलीप धायगुडे, राजू मोहन, प्रवीण चाबूकस्वार,वर्षा जाधव तसेच कामगार नेते तुकाराम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे, बापू गायकवाड आदी उपस्थित होते.
उल्हास जगताप म्हणाले, यशस्वी होणारा विद्यार्थी लोकांना दिसतो. परंतु त्यापाठीमागे त्यांनी केलेली मेहनत, जिद्द, चिकाटी आणि ठरवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेले अविरत परिश्रम, धडपड दिसली पाहिजे. त्यांनी केलेल्या परिश्रमावर प्रकाश टाकावा आणि नव्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर त्यांचा आदर्श निर्माण व्हावा, हा या सन्मान करण्यामागचा उद्देश आहे असे ते म्हणाले.
सन्मानार्थीमध्ये अनुप पाटील (उपजिल्हाधिकारी), तेजल राऊत, लक्ष्मण झोरे, वसंत ठाकरे, रामचंद्र तांबे, सारिका नारखेडे, सतीश धोंगडे, पायल परदेशी, किरण मुंडे (पोलीस उपनिरीक्षक), जीवन भालेराव, सचिन लांघी, इम्रान शेख, विनोद कांबळे, तुषार गिरंगे(पोलीस कॉन्स्टेबल), ज्ञानेश्वर पन्हाळकर, सत्यजित घाडगे, प्रीतम पडवळ(तलाठी) तसेच सोनाली धोगे (सहाय्यक कक्षाधिकारी, मुंबई मंत्रालय), ममता ठाकरे (प्रशासन अधिकारी यवतमाळ महानगरपालिका), कुंदन धोगे (विकास अधिकारी), विकास वाघमारे (लेखापाल), अक्षय खराडे (टेक्निशियन), अनिकेत पाटील (सहाय्यक अभियंता,जलसंधारण), मुक्ता भताने (स्टेशन मॅनेजर, मुंबई मेट्रो), प्रसाद भोसले (लोकोपायलट), गणेश डावकोरे (लिपिक शिवाजीनगर कोर्ट), निखील देसले (कनिष्ट अभियंता), अक्षय ढाकणे (तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय,ठाणे), अतुल गावडे (सहाय्यक निरीक्षक मोटार व्हेईकल), केतन खैरे (पोस्टमन) यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
आपले भवितव्य उज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रांचा उपयोग करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रबोधन पर्वामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सत्यपाल महाराज यांचे शिष्य अभियंता पवन दवंडे यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम झाला. शिक्षण हा अज्ञानावर प्रभावी उपाय असला तरी शिकलेल्या लोकांनी अंधश्रद्धेवर आधारीत वर्तन केले तर त्यांना शिक्षित म्हणायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापुरुषांनी दिलेला मार्ग हा आपल्याला उन्नतीकडे घेऊन जात असल्याने या विचारांचे अनुसरण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ज्येष्ठ कवी गायक प्रतापसिंग बोदडे, गायक कुणाल बोदडे आणि सारेगमप फेम एड.रागिणी बोदडे यांनी गीतगायन केले. सुप्रसिध्द गायक प्रकाशदीप वानखडे यांचा ‘संविधानाचा आलाप’ हा संगीतमय कार्यक्रम झाला. कुणाल वराळे आणि राधा खुडे यांनी ‘ गाथा युगपुरुषाची’ हा महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांवर आधारीत कार्यक्रम सादर केला. कोसंबी बंधू, कोल्हापूर यांनी जयभीमचा नारा हा संगीतमय कार्यक्रम सादर केला.
प्रबोधन पर्वामध्ये अखेरच्या दिवशी मारुती जकाते आणि सुधाकर वारभुवन यांचा तर मुझिक मेकर्स प्रस्तुत गीतगायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. लेणी अभ्यासक सागर कांबळे यांनी ‘लेणी संवर्धन’ याविषयावर व्याख्यान दिले. गायक राहुल भोसले यांचा भीम स्वर गंधार हा भीमगीतांचा कार्यक्रम झाला. प्रवीण येवले, संकल्प गोळे, प्रज्ञा इंगळे तसेच स्वप्नील पवार, निशांत गायकवाड, रोमेओ कांबळे आणि मुन्ना भालेराव यांनीही गीतगायन केले.