मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची केंद्राच्या विरोधात निदर्शने
![NCP protests against the arrest of Minister Nawab Malik](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/pjimage-9-5.jpg)
पिंपरी चिंचवड | ”बीजेपी हमसे डरती है, ईडी को आगे करती है”, ”मोदी जब जब डरते है, तब तब ईडी को आगे करते है”, ”शर्म करो, शर्म करो, मोदी सरकार शर्म करो”, ”भाजप वाल्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, ”नवाबभाई आगे बडो, हम तुम्हारे साथ है”, ”गांधी लडे थे गोरे से, हम लढेंगे चोरे से”, ”भाजप सरकार हाय, हाय, भाजप सरकार हाय हाय” अशा जोरदार घोषणा देत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज (बुधवारी) अटक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध केला जात आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राहुल भोसले, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयूर कलाटे, राजू बनसोडे, संजय वाबळे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक काळुराम पवार, जगनाथ साबळे, तानाजी खाडे, गोरक्ष लोखंडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, विजय लोखंडे, कविता खराडे, उज्वला ढोरे, पल्लवी पांढरे आदी कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ”कोणतीही नोटीस न देता मंत्री नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशीसाठी घरी बोलविले. मंत्री मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केंद्र सरकार, भाजपच्या विरोधात भूमिका मांडत होते. एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्या चुकीच्या कारवाईची पोलखोल केली. त्याचा सुड घेण्यासाठीच मंत्री मलिक यांच्यावर कारवाई केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार देशात काम चालले आहे का असा प्रश्न पडतो. ईडी, सीबीआय, इनक्म टॅक्स या वेगवेगळ्या एजन्सींचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. देशातील सरकार सुडाची भावना ठेऊन काम करत आहे. महागाई, बेरोजगारी प्रंचड वाढली. त्यावरील लक्ष दुर्लक्ष करण्यासाठी अशा कारवाया केल्या जात आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्याचा भाजपला राग आहे. हे सरकार चांगले काम करत आहे. सरकार पडत नाही हे लक्षात आल्यानेच मंत्र्यांना बदनाम केले जात आहे. यापुढे शहरात ठिकठिकाणी आंदोलने करुन भाजपच्या चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठवावा लागेल. येणारा काळ महत्वाचा आहे. त्यासाठी आपल्याला भाजपच्या विरोधात जनतेमध्ये जावे लागणार आहे”.
योगेश बहल म्हणाले, ”देशाच्या 74 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राजवटीत एजन्सींचा सर्वाधिक वापर होत आहे. भाजपचा बुरखा फाडणा-यांवर कारवाईसाठी एजन्सींचा वापर केला जातो. त्यामुळे सर्वांनी जागरुक होण्याची गरज आहे. हिटलरपेक्षा मोदी सरकार खराब आहे. त्यामुळे भाजपला त्यांची जागा दाखविली पाहिजे. सत्तेसाठी भाजपवाले येडे झाले असून त्यासाठी ईडीचा वापर करतात”
भाऊसाहेब भोईर म्हणाले, ”यापूर्वी लोकांना ईडी हा प्रकारच माहित नव्हता. परंतु, खालच्या पातळीवर जाऊन विकृतपणे काम केले जात आहे. नवाब मलिक हे केंद्रीय एजन्सीचे चुकीचे काम पुढे आणत होते. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केली. ईडीकडे लक्ष वेधून मुळ प्रश्नांकडील लक्ष हटविले जात आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे”.
महिला अध्यक्षा कविता आल्हाट म्हणाल्या, ”मंत्री नवाब मलिक यांनी वास्तावाला वाच्या फोडली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली. ही खेदजनक बाब आहे. लोकशाहीपद्धतीने काम करणा-या मंत्र्याला केंद्र सरकार एजन्सीच्या माध्यमातून अटक करत आहे. खालच्या स्तराला जाऊन भाजपकडून काम केले जात आहे”