ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठा बांधवांनो स्वतःच्या जीवाला जपा -सतीश काळे

मराठा आंदोलक प्रसाद देठे यांच्या आत्महत्यानंतर संभाजी ब्रिगेडची भावनिक साद

पिंपरी : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी लढा सुरूच आहे. हे आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसायचे नाही. मात्र आरक्षणाची लढाई लढताना कुटुंबाचा विचारही करणे गरजेचे आहे. आत्महत्या करून कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका, अशी भावनिक साद संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी घातली.

मराठा आरक्षणासाठी आंदोलक प्रसाद देठे यांनी नुकतीच आत्महत्या केली. त्यावरून राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यावरून काळे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, राज्यात मराठा आरक्षणाची लढाई तीव्र सुरु आहे. इतर कोणत्याही समाजाला न दुखावता मराठा बांधव कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडत आहेत. या लढाईत मराठा समाजातील लहान मुलांसह वयस्कर देखील सहभागी होत आहे. मात्र राज्य सरकार आरक्षण देताना उदासीनता दाखवीत आहे. परिणामी मराठा समाजाच्या अनेक पिढयांचे नुकसान होत आहे. त्यामधूनच नैराश्य येऊन अनेक बांधव आत्महत्या सारखा मार्ग निवडत आहेत. अनेक घटना तशा घडल्या आहेत. प्रसाद देठे या बांधवानेही हे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आम्हाला आरक्षण मिळू द्या, अशी भावनिक साद ओबीसी नेत्यांना प्रसाद यांनी चिट्टीतून घातली. आत्महत्या करताना माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नसून मी स्वखुशीने हे करत असल्याचे प्रसाद यांनी दिलेल्या चिट्टीत आढळले आहे.आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका असे मनोज जरांगे यांनाही आवाहन करत कुटुंबाला काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी आणखी एक बांधव शहिद झाला याचे राज्यभरातील मराठा सेवकांना अतोनात दुःख झाले आहे. त्यांची नाळ मराठा सेवकांशी जोडली होती. त्यांच्या कुटूंबियांना या दुःखातून बाहेर येण्याचे बळ मिळो, असे काळे म्हणाले.

आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. राज्य सरकारला त्या बाबत सकारात्मक पाऊल उचलण्यसाठी मराठा बांधव भाग पाडतील. त्यासाठी मनोज जरांगे पाटील चांगले नेतृत्व करत असून यांच्या मागे ताकदीने उभे राहावे, असे आवाहन सतीश काळे यांनी केले.

चौकट : मराठा बांधवाच्या कुटुंबाला सढळ हाताने मदत करा : काळे 
आरक्षणाच्या लढाईत शहिद झालेले मराठा बांधव प्रसाद देठे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत्य नाजूक आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. प्रसाद हे एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. मराठा आरक्षणासाठी प्रसाद देठे अनेक वर्षापासून आरक्षणाच्या लढ्यात सक्रिय होते. सध्या त्यांच्या घरची परिस्थिती बिकट असून कर्ता माणूस गमावल्याने अनके अडचणीचा कुटुंबांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एका कुटुंबाला आधार देण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी, असे आवाहन सतीश काळे यांनी केले.

प्रतिक्रिया :
मराठा समाजाच्या लेकरांचे कल्याण होण्यासाठी त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येण्यासाठी आताची मराठा बांधवांची पिढी झगडत आहे. कायदेशीर मार्गाने ही लढाई जिंकलीच जाईल. मात्र मराठा बांधवांनी आता चुकीचे आत्महत्यासारखे पाऊल उचलणे थांबवावे. आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, हक्काचे आरक्षण आपण मिळवूनच राहू.
– सतीश काळे,अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड,पिंपरी चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button