‘महायुतीकडून २ वर्षापासून राज्यातील जनतेची दिशाभूल’; काशिनाथ नखाते
हा अर्थसंकल्प केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आशा दाखवण्याचा प्रयत्न
![Kashinath Nakhate said that the people of the state have been misled by the Mahayuti for 2 years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Kashinath-Nakhate-2-780x470.jpg)
पिंपरी | शिंदे फडणवीस सरकारला येत्या ३० जूनला २ वर्षे पूर्ण होतात या दोन वर्षांमध्ये भरीव विकासकामे झालेले नाहीत आणि आज जाहीर केलेल्या घोषणा या २ वर्षांपूर्वी सुरू केल्या असत्या तर महाराष्ट्रातील जनतेला लाभ झाला असता त्यांना ते द्यायचेच नाही म्हणून आजची घोषणा ही केवळ घोषणाच राहणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात असून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, त्याचबरोबर शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे तो न देता,शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा तोकडा प्रयत्न सरकार करत आहे त्याचबरोबर मध्यप्रदेशच्या सरकारने केलेली कॉपी-पेस्ट करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करणार यामध्येही प्रत्यक्षात योजना सुरू होईपर्यंत काही सत्यता दिसत नाही या अर्थसंकल्पात रोजगार वाढीसाठी कुठल्याही तरतूद दिसून येत नाही. महागाई प्रचंड वाढलेली असून जीएसटी मुळे सामान्यांचे हाल झालेले असून सरकार केवळ घोषणाबाजी आणि जाहिरातीत मग्न आहे, असं काशिनाथ नखाते म्हणाले.