घरकुल येथील गाळे वाटपात प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या गोरगरिबांवर अन्याय : बाबा कांबळे
![Injustice on the poor who do direct business in allotment of flats at Gharkul: Baba Kamble](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/WhatsApp-Image-2022-07-08-at-5.08.23-PM.jpeg)
- प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचा आयुक्तांचे आश्वासन
- हॉकर्स झोन पुनर्वसनाच्या नावाखाली फेरीवाल्यांची फसवणूक थांबवा ; बाबा कांबळे यांची मागणी
पिंपरी / प्रतिनिधी
घरकुल चिखली येथे नुकतेच व क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे यांच्या हस्ते गाळे वाटप करण्यात आले आहे. या गाळे वाटपात गरिब व्यावसायिकांवर अन्याय झाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केली आहे. हॉकर्स झोन पुनर्वसनाच्या नावाखाली फेरीवाल्यांची फसवणूक थांबवा अशी मागणीही बाबा कांबळे यांनी केली आहे. अन्यथा फेरीवाल्यांना घेऊन मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला. या वेळी आयुक्त राजेश व अतिरीक्त आयुक्त राजेंद्र वाघ, यांच्याशी संघटनेच्या पदाधिकऱ्यांच्या चर्चा झाली. या वेळी प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.
खली घरकुल येथे अन्यायकारक गाळे वाटपाच्या निषेधार्थ व्यावसायिकांनी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली. या वेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आम्हाला न्याय देण्याची मागणी संघटनेकडे केली. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.
वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांनुसार महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार हे गाळे वाटप करण्यात आले असे सांगण्यात आले आहे. या वेळी फेरीवाल्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करत आहोत. आम्ही घरकुल मध्ये राहायला आहे. परंतु अधिकारी मनमानी पद्धतीने काम करत आहेत. आमचे ऐकत नाहीत. आम्हाला न्याय देत नाहीत. त्यामुळे या बाबत न्याय द्या, अशा भावना फेरीवाल्यांनी व्यक्त केल्या.
या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, 2005 पासून आम्ही फेरीवाल्यांसाठी संघर्ष सुरू केला आहे. 2007 मध्ये फेरीवाल्यांचा पहिला कायदा मंजूर करून घेतला. परंतु हा कायदा नेमका काय आहे ? त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा आहेत ? फेरीवाल्यांचे पुनर्वसन कशा पद्धतीने केले पाहिजे ? त्यासाठी कोणकोणत्या सुविधा असल्या पाहिजे ? याबद्दल सर्व या धोरणामध्ये तरतूद करण्यात आली आहे. मात्र त्याची अधिकारी अंमलबजावणी करत नाहीत. प्रत्यक्ष मात्र मनमानी पद्धतीने फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया शहरांमध्ये सुरू आहे. त्यामध्ये क्षेत्रीय कार्यालय येथे अनागोंदी कारभार सुरू आहे. यापूर्वी देखील कृष्णानगर येथील भाजी मंडईमध्ये पैसे घेतल्याचे आरोप अधिकाऱ्यांवर झाले. या प्रकरणी आयुक्त लक्ष देतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांची देखील अनस्थाच असल्याचे दिसले.
घरकुल येथे झालेल्या सोडतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब व्यावसायिकांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आहेत. कायद्याप्रमाणे कोणते काम झाले नाही, असे व्यावसायिक सांगत आहेत. त्यामुळे या वर योग्य तोडगा न निघाल्या तीव्र आंदोलन करू असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.
या वेळी आयुक्त राजेश पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले की, प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर अन्याय होऊ देणार नाही. संघटनेसोबत रीतसर बैठक घेऊन गाळे वाटप करू.