बेळगावच्या विजयाची पुनरावृत्ती पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये होईल : अमोल थोरात
![Belgaum's victory will be repeated in Pune, Pimpri-Chinchwad: Amol Thorat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/अमोल-थोरात.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
कर्नाटकसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले. ५८ पैकी ३६ जागांवर विजय मिळवत भाजपाने वर्चस्व राखले आहे. यापद्धतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपा विजयाची पुनरावृत्ती करेल, असा विश्वास पिंपरी-चिंचवड भाजपाचे मुख्य प्रवक्ते तथा संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी व्यक्त केला आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीत निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपाला ३६ जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला ९ आणि इतरांना बेळगावी नगरपालिकेच्या एकूण ५८ जागांपैकी १३ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.
दरम्यान ‘‘बेळगावमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता येईल, असा संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे. तिथले मराठी भाषिक एकत्र आले आहेत आणि पुन्हा पालिकेवर भगवा ध्वज फडकवतील. आमच्या मनात जे आहे तेच व्हाव अशी आशा आम्ही करतो,’’ असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले होते. अखेर भाजपाने बेळगाव महापालिकेवर बहुमताने सत्ता मिळवली आहे.
मराठी अस्मितेचे दर्शन घडवण्यासाठी मराठी भाषकांनी हिरिरीने मतदानात सहभाग नोंदवला होता. सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेची निवडणूक आठ वर्षांनंतर झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रथमच चिन्हावर उतरले होते. त्यामध्ये भाजपा ५५, काँग्रेस ४५, धर्मनिरपेक्ष जनता दल ११, आम आदमी ३७, एमआयएम ७, अन्य दोन अपक्ष अशा २१७ उमेदवारांचा समावेश होता.
**
महाविकास आघाडीच्या भ्रमाचा भोपळा फुटणार : थोरात
अमोल थोरात म्हणाले की, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यामध्ये भाजपाने गेल्या ५ वर्षांमध्ये लोकांच्या हिताचा कारभार केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे या दोन नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा पुन्हा एकदा महापालिकेत सत्ता मिळवणार आहे. भाजपाचे ध्येय १००+ असेच राहणार आहे. त्यादृष्टीने आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलो आहे. बेळगावचा निकाल हा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडणारा ठरणार आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे.