आंद्राचे पाणी पुन्हा कमी झाले, अधिका-यांची तातडीने बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Untitled-design-18-780x470.jpg)
पिंपरी : गेल्या दाेन दिवसांपासून इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने अवघे ४५ एमएलडीच पाणी शहरासाठी मिळत आहे. त्यामुळे ४० एमएलडी पाण्याची तूट जाणवत असल्याने महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांची पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांबराेबर बैठक झाली.
शहराला गेल्या सव्वा चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. मावळातील पवना धरणातून ५१०, आंद्रा धरणातून पहिल्या टप्प्यात ८५ तर एमआयडीसीकडून २० असे ६१५ एमएलडी पाणी शहराला देण्यात येते. आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीत साेडून निघोजे बंधाऱ्यातून दाेन पंपाद्वारे उचलून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तिथे प्रक्रिया झाल्यानंतर जलवाहिन्यांद्वारे पाणी शहराला वितरित केले जात आहे. मात्र, गेल्या दाेन दिवसांपासून आंद्रा धरणातून ४५ एमएलडीच पाणी मिळत आहे. त्यामुळे साधारण ४० एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. तसेच मार्चमध्येही १५ दिवस पाण्याची अशीच समस्या निर्माण झाल्याने महापालिकेने एमआयडीसीकडून घेण्यात येणारे पाणी वाढविले हाेते.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड शहरातील सनदी लेखापालांचा लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदानाचा निर्धार
आंद्रा धरणातून पाणी कमी येत असल्याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर आयुक्त शेखर सिंह, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांच्यासह पाणी पुरवठा विभागातील इतर अधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत आंद्रा धरणातून पुरेसे पाणी इंद्रायणी नदीत साेडावे, निघाेजे येथील बंधा-याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशा सूचना महापालिकेच्या वतीने करण्यात आल्या. दरम्यान, निघाेजे बंधा-यात पाण्याचा पुरेसा साठा हाेत नसल्याने दाेन पंपाऐवजी एकाच पंपाव्दारे पाणी उपसा केला जात आहे.