हक्कासाठी कष्टकरी कामगार यापुढे प्रभावी लढा देतील – काशिनाथ नखाते
![Hakkasathi grievous worker yadhe effective ladle - kashinath nakhte](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/narayan-meghaji-lokhande.jpg)
– नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्मृतीजागर कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी | प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या ७३ वर्षात रस्त्यावर उतरून कामगारांच्या हक्कासाठी अद्यापही झगडावे लागत आहे. कष्टकरी माणसांसाठी नवे कायदे होणे आवश्यक आहे. जुने कामगार कायदे मोडून नवीन अन्यायकारक कायदे केले आहेत. वाढत्या महागाईनुसार वेतन मिळत गेले पाहिजे. यासाठी कष्टकरी कामगार यापुढे निश्चित प्रभावी लढा देतील, असे प्रतिपादन कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, दिलासा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीजागर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते.
कष्टकरी संघर्ष महासंघाच्या चिंचवड कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कामगार भूषण जयवंत भोसले, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते , वंदना थोरात, माधुरी जलमुलवार, राजेश माने, उमेश डोरले, मधुकर वाघ, सुखदेव कांबळे, ओमप्रकाश मोरे, कार्तिक सुतार, निरंजन लोखंडे, शैलेश प्रसाद, फरीद शेख आदी उपस्थित होते.
पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की, हल्ली कामगार चळवळीची धार बोथट होऊ लागली आहे. कामगार चळवळ कामगारांची राहिली नाही. ब्रिटिश सरकारने नारायण मेघाजी लोखंडे यांना रावबहादूर पदवी दिली. मात्र सध्या आपल्याच लोकशाही व्यवस्थेत आजही कामगार आणि शेतकरी त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत. कामगार चळवळ करताना कुठवर ताणायचे याचा सामंजस्याने विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले.
प्रमुख पाहुणे जयवंत भोसले म्हणाले की, नारायण मेघाजी लोखंडे यांचा आदर्श घेऊन एस एम जोशी, भाई वैद्य, रुपमय चटर्जी यांनी कामगारांसाठी उत्तम काम केले. कामगारांनी कायम एकजूट रहावे.
दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंचलन केले. कामगारांना सामूहिक शपथ दिली. अर्चना कांबळे यांनी आभार मानले.