सांगोल्याच्या शेतक-यांचे सिंचन भवन कार्यालयासमोर धरणे आंदोलन
- निरा उजवा कालवा शाखेच्या पाणी वापर संस्थेचे शेतकरी उतरले आंदोलनात
पुणे ( महा ई न्यूज ) – वर्षांनूवर्षे दुष्काळाच्या झळा सोसलेल्या सांगोल्याच्या शेतकरी पुत्रांनी एकत्र येत पाण्यासाठी एल्गार पुकारला आहे. निरा उजवा कालवा शाखा -5 मधील पाणी वापर संस्थानी पुण्यातील सिंचन भवनासमोर आज (सोमवार) बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. गेली पन्नास वर्षे हक्कांच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकरी पुत्राला आजही पाण्यासाठी झगडावे लागत आहे.
पुण्यातील सिंचन भवनसमोर दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतकरी हक्कांच्या पाण्यासाठी आंदोलन करीत आहेत. तेथील शेतक-यांच्या हक्काचे पाणी अनेक राज्यकर्त्यांनी पळवून नेले. अधिका-यांच्या करामतीमुळे कागदोपत्री सांगोला तालुका लाभार्थी दाखविला गेला. परंतू, आता शेतकरी पुत्र जागा झाला आहे. पन्नास वर्षे दुष्काळी चटके सोसलेल्या शेतक-यांच्या दोन पिंढ्या राजकर्त्यांनी बरबाद केल्या. त्यामुळे आमच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे, या मागणीसाठी शेतकरी पुत्र आंदोलनात उतरले आहेत.
या आंदोलनात आम्हाला प्रकल्पीय तरतुदीनूसार हक्काचे पाणी मिळावे, उन्हाळी हंगाम 2019 मध्ये लाभ क्षेत्रातील 1 एकर ही भिजले नाही. त्यामुळे डाळींब, द्राक्षे, फळबागा उध्दवस्त होत आहेत. त्यामुळे उन्हाळी आवर्तनाच्या 2018-19 हंगामाचे पाणी सोडावे, पुढील हंगामापासून एनआरबीसी ब्रॅंच -3 बरोबरच सांगोला शाखा कालवा ब्रॅंचच 5 चे आवर्तन सुरु करण्यात यावे, प्रलंबित असलेली कालवा हस्तांरित प्रक्रिया संबंधित संस्थाना पुर्ण करावी, निरा उजवा कालवा सल्लागार समितीमध्ये पाणी वापर संस्थाना प्रतिनिधीत्व मिळावे, उन्हाळी हंगाम 2019 पाणी वाटपात झालेल्या अनियमिततेची उच्चस्तरीय चाैकशी करावी, सांगोला शाखा कालव्याचे अपुर्ण वितरकांचे अस्तरीकरण करावे, सर्व वितरकांवर पाणी मोजणी यंत्रे बसविण्यात यावी, तसेच धरण पुर्ण क्षमतेने भरल्यावर अतिरिक्त पाणी सांगोल्याला मिळावे, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.