सत्ताधा-यांच्या खाबूगिरीने शहराचा दर्जा घसरला ; तुमच्यापेक्षा पहिले बरे होते, खासदार श्रीरंग बारणे यांची भाजपवर टिका
शहरातील प्रलंबित प्रश्नाचा घेतला आढावा, आयुक्तांचा प्रशासनावर अकुंश नाही
पिंपरी – शहरात रस्त्याची चाळण झालीय, चाैकाचाैकात हातगाड्याचे अतिक्रमण वाढलंय, धरण शंभर टक्के भरले असताना अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागलीय, ड्रेनेज लाईन व्यवस्था नसल्याने रस्त्यावरील पाण्याने झोपडपट्यामध्ये दुर्गंधी सुटलीय, यावर महापालिकेचे अधिकारी केवळ टोलवाटोलवीची उत्तरे देवू लागलेत. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनावर आयुक्तांचे कुठलेही नियंत्रण, अकुंश राहिलेले नाही. स्थानिक गुंडाच्या मदतीने सर्रासपणे हप्ते वसुली करुन अतिक्रमणला पाठबळ मिळत असून सत्ताधा-याच्या खाबूगिरीने शहराचा दर्जा घसरला आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. तसेच तुमच्या पेक्षा पहिले बरे होते, अशी परस्थिती महापालिकेत आहे, असे सांगत त्यांनी भाजपच्या कारभारावर टिका करीत राष्ट्रवादीचे समर्थन केल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु होती.
महापालिका हद्दीतील प्रलंबित प्रश्नाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर समवेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला आमदार गाैतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष योगेश बाबर, नगरसेवक निलेश बारणे, सचिन भोसले, प्रमोद कुटे, नगरसेविका आश्विनी चिंचवडे आदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले की, पवना धरण शंभर टक्के भरले आहे. तरीही अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. शहरात पाणी गळती 38 % हून अधिक आहे. केवळ नियोजनाचा अभावामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येकवर्षी कोट्यवधी रूपये हे शहरात रस्ते डांबरी करणावर खर्च होतात. परंतू,निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यांवरील पडलेल्या खड्डेने अपघातातून एखाद्याचा बळी जाईल, अशी स्थिती झाली आहे.