सत्ताधारी कारभा-यांच्या प्रभागात अंघोळीला नाही पाणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/4pcmc_81.jpg)
– ‘धरण उशाला अन्ं कोरड घशाला’ पिंपळे गुरवची अवस्था
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण फुल्ल झाले आहे. केवळ निष्काळजी व नियोजन शुन्य अधिका-यामुळे पिंपळे गुरवमध्ये नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे कारभारी असलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदार संघात पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शहरातील अन्य परिस्थिती वेगळी नसल्याचे यावरुन दिसून येत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झालेल्या पिंपळे गुरवमध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने होवू लागल्याने आधी पुरेसे पाणी द्या, मग परिसर स्मार्ट करा, अशी मागणी नागरिकांकडून होवू लागली आहे.
महापालिकेच्या आज ( मंगळवारी) झालेल्या स्थायी समितीत प्रभाग क्रमांक 29 नगरसेवक सागर अंघोळकर यांनी अपुरा व कमी दाबाने होणा-या पाणी पुरवठ्याबाबत अधिका-यांना धारेवर धरले. परंतू, पाणी पुरवठा विभाग अधिका-यांमध्ये सुधारणा होताना दिसत नाही. नगरसेवकांना केवळ गोल-गोल उत्तरे देवून बघतो, पाहतो, करतो अशी उत्तरे देवून वेड्यात काढण्याचा प्रकार होवू लागला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्याच्या नियोजनशून्य कारभारामुळेच ही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप नगरसेवक सागर अंघोळकर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केला. ते म्हणाले की, मोरया पार्क, लक्ष्मीनगर, बाबू नगर, क्रांतीनगर, काशिद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, गोकुळनगरी, भालेकरनगर, सुदर्शन नगर आदी भागात पाण्याची टंचाई निर्माण होवू लागली आहे. तसेच निगडी प्राधिकरणातही अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे नगरसेवक अमित गावडे यांनी सांगितले.
दरम्यान, धरण भरूनही पाण्याची ही स्थिती असेल,तर उन्हाळ्यात काय अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या स्थितीला पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. निष्क्रिय अधिका-यांच्या बदल्या केल्यानंतरच ही समस्या निकालात निघेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.