शहरवासियांनो… पाणी जपून वापरा ; महावितरणाचा खेळखंडोबा झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत
पिंपरी – महापालिकेच्या रावेत येथील पंपिग स्टेशनचा विद्युत पुरवठा पहाटे 2.30 ते 5 या कालावधीत खंडीत झाला होता. याप्रसंगी पंपिग होऊ न शकल्याने शहरातील पाण्याच्या टाक्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे शहरात सकाळी व सायंकाळी होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणातून नदी सोडलेले पाणी महापालिकेच्या रावेत तेथील पंपिंग स्टेशनहून उचलून निगडीतील जलशुध्दीकरण केंद्रात त्यांच्यावर प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर शहरवासियांना तेथून शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यातून पाणी पुरवठा करण्यात येतो.
दरम्यान, सध्यस्थितीत पाऊस सुरु असल्याने महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे रावेत पंपिग स्टेशनचा विद्युत पुरवठा मंगळवारी पहाटे अडीच ते पाच या कालावधीत सुमारे अडीच तास खंडीत झाला होता. त्यावेळी पंपिग होऊ न शकल्याने पाण्याच्या टाक्या भरलेल्या नाहीत. म्हणून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत व कमी दाबाने राहणार आहे. याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घेवून पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.