विराजची हत्या करणा-या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, घटनेतील तरुणीला सहआरोपी करावे – रामदास आठवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/IMG-20200614-WA0005.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
विराज जगताप यांची हत्या करणा-या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच संबंधीत घटनेतील तरुणीला सहआरोपी करावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पिंपरी येथे केली.
रविवारी रात्री (दि. 7) पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या बौध्द तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. केंद्रीय मंत्री आठवले यांनी शनिवारी (दि. 13) सायंकाळी जगताप यांच्या कुटूंबांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यानंतर पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, सुरेश निकाळजे, परशूराम वाडेकर, बाळासाहेब रोकडे, के.एम. बुख्तर, सम्राट जकाते, सुधाकर वारभुवन आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, विराजची हत्या ही घटना अंत्यत गंभीर आहे. महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते की, सवर्ण, मराठा आणि मागासवर्गीय समाज एकत्र आला पाहिजे. जाती जातीमधील कटूता नष्ट झाली पाहिजे. मराठा समाज व मागासवर्गीय समाजाने राज्यात गुण्या गोविंदाने रहावे यासाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपण नेहमी प्रयत्नशील असतो.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील व देशातील कोरोना विषयीची परिस्थिती गंभीर आहे. हा संसर्गजन्य आजार असून सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळावे असे आवाहन आठवले यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला 1 लाख 70 हजार कोटी रुपये त्यानंतर 11 कोटी रुपये कोरोनाच्या उपचारासाठी जाहीर केले. तसेच 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. लॉकडाऊन काळात आजपर्यंत 56 लाखांहून जास्त मजूरांना आपआपल्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने प्रवासी ट्रेनच्या माध्यमातून मदत केली. तसेच आता कारखाने सुरु होताना या मजूरांना पुन्हा कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.