विद्यार्थ्यांचा परदेशातील शिक्षणाचा खर्च सामाजिक न्याय विभाग करेल – मंत्री दिलीप कांबळे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/4.jpg)
पिंपरी – मागासवर्गीय समाजातील इ.१२ वी नंतरच्या विद्यार्थांचा तसेच पदवीधर विद्यार्थ्यांचा देशातील तसेच परदेशातील शैक्षणिक खर्च सामाजिक न्याय विभाग करेल. तसेच, शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन, भुकंप, अल्पसंख्याक विकास व वक्फ मंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १ ते ५ ऑगस्ट दरम्यान भक्ती शक्ती चौक निगडी येथे आयोजित करण्यात आलेल्या साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधनपर्वाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लोकशाहिर अण्णा भाऊ साठे कलारत्न पुरस्कार सोपान हरिभाऊ खुडे यांना अण्णा भाऊ साठे प्रबोधनपर्व समितीच्या वतीने त्यांच्या हस्ते देण्यात आला कार्यक्रमास महापौर राहुल जाधव, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, शिक्षण मंडळ उपसभापती शर्मिला बाबर, नगरसदस्या सुमन पवळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे माजी नगरसदस्य प्रल्हाद सुधारे, साहित्यिक सोपान हरिभाऊ खुडे, प्रबोधनपर्व समितीचे अध्यक्ष अरुण जोगदंड आदी यावेळी उपस्थित होते.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, प्रबोधनपर्वाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याच्या अनेक पैलूंचे दर्शन जनतेला झाले. समाजाने कायम एकसंध राहणे, समाजाच्या प्रवाहात येणे ही काळची गरज आहे. अण्णाभाऊ साठे यांचे विचार देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे सामाजिक कार्य या प्रबोधनपर्वाद्वारे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला असल्याचे ते यावेळी म्हणाले.
दिलीप कांबळे म्हणाले की. शहरात व्यवसाय करणा-या युवकांना मागासवर्गीय महामंडळाच्या वतीने १ ते १० कोटींचे कर्ज देण्यात येईल. परंतू, कर्ज घेऊन व्यवसाय करा. घर-प्रपंच सांभाळा व कर्ज फेडा. शासन राबवित असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा व त्याबाबत इतरांना माहिती द्यावी. सर्व समाजाने संघटीत होऊन समाज बळकटीसाठी कार्य करावे, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी सोपान हरिभाऊ खुडे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्या सुमन पवळे, मनोज तोरडमल, संदिपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, अशोक कांबळे, अमित गोरखे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण जोगदंड यांनी केले. सुत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे व किशोर केदारी यांनी केले. तर, आभार अनिल सौंदडे यांनी मानले.