राज्याचे शिक्षण मंत्री, श्री श्री रवी शंकर, श्री बाळासाई बाबा यांच्या पदव्या बोगस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/PHOTO.jpg)
- केअर ऑफ पब्लिक सेफ्टी संस्थेने केला खुलासा
- डॉ. अभिषेक हरिदास यांची पत्रकार परिषदेत मागणी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
केअर ऑफ पब्लिक सेफ्टी (COPS) संस्थेने बोगस विद्यापीठांच्या विरोधात व्यापक मोहीम सुरू केली असून त्याला समाजाच्या विविध स्तरांमधून वाढता पाठिंबा मिळत आहे. असे असले तरीही शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती अशा बोगस विद्यापीठांकडून मिळालेल्या पदव्या अभिमानाने मिरवीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पिंपळे निलख येथील निता ट्रेनिंग अँड कन्सल्टींग या संस्थेकडून पदवी मिळवलेल्या नागरीकांमध्ये शहरातील सुमारे 70 लोकांचा समावेश असून हे नागरीक पदवी देणाऱ्या संस्थेइतकेच दोषी आहेत, असा दावा केअर ऑफ पब्लिक सेफ्टी संस्थेचे डॉ. अभिषेक हरिदास यांनी पत्रकार परिषदेत केला.
पिंपरी येथे बुधवारी (दि. 5) आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष आदम बेग, प्रदीप माने, राहुल विटकर, धनराज चौधरी आदी उपस्थित होते. अशा पद्धतीच्या महाराष्ट्रात सुमारे एक हजार बोगस विद्यापीठांचा सुळसुळाट झाला असून हजारो तरुणांना बोगस पदव्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी डॉ. हरीदास यांनी केली आहे. तसेच यापूर्वीच आपण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखलीयाल, लातूरचे माजी खासदार सुनील बळीराम गायकवाड, शिवसेनेचे आमदार राजन साळवी, सध्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, माजी उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु श्री श्री रवि शंकर आणि भगवान श्री बाळासाई बाबा यांनी मिळविलेल्या पदव्या आणि त्यांना पदवी देणारे विद्यापीठ यूजीसीकडे नोंदणी झालेले नाही. यातील काही सन्माननीय व्यक्तींनी श्रीलंकेसारख्या परदेशातील विद्यापीठांच्या डॉक्टरेट पदव्या घेतल्या आहेत. परंतू, श्रीलंकेच्या सरकारने देखील अशी विद्यापीठे आमच्याकडे नोंद नसल्याचा निर्वाळा दिला आहे, असे डॉ. हरिदास यांनी सांगितले.
निता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड कन्सल्टींग सर्व्हिसेस या संस्थेविरोधात वाकड पोलिस ठाणे येथे एफआयआर नं. 0083 कलम 420 अंतर्गत दि. 1 फेब्रुवारी 2020 रोजी ‘सीओपीएस’ संस्थेने एफआयआर दाखल केला आहे. यूजीसीकडे या विद्यापीठाची नोंदणी नसल्याने संस्था बोगस ठरते. तसेच त्यांनी दिलेल्या पदव्यादेखील बोगस आहेत. या संस्थेवर कारवाईची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. परंतु या संस्थेच्या पदव्या मिरवणाऱ्या आणि त्या पदव्यांच्या आधारे व्यवसाय करणाऱ्यांवरदेखील कारवाई झाली पाहिजे. त्यांच्याकडील या बोगस पदव्या तातडीने जप्त केल्या पाहिजेत अन्यथा या व्यक्ती समाजाचे अपरिमित नुकसान करू शकतात, अशी भितीही डॉ. हरिदास यांनी व्यक्त केली आहे.