रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न केल्यास आंदोलन – सतीश कदम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/satish-kadam.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील रस्त्यांची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करावीत. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम यांनी दिला आहे.
सतीश कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पावसाळा तोंडावर आला आहे. मे महिना संपायला पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही अजूनही शहरातील रस्ते, गटारांची कामे संथगतीने सुरू आहेत. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास शहरवासीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. जलवाहिनी टाकणे, भूमिगत गटारे, केबल डक्ट तसेच जलनिःस्सारणांच्या कामांसाठी शहरात सगळीकडे रस्त्यांची खोदाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना चालणे देखील मुश्किल होत आहे. खोदाई केल्यानंतर खड्डे व्यवस्थितरित्या बुजविले जात नाहीत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोदलेल्या रस्त्यांमुळे पिंपरी-चिंचवडकर हैराण झाले आहेत.
निगडी येथील मधुकर पवळे पुलाच्या बाजूला खोदाई केल्यानंतर रस्ता पुर्णपणे बुजविला नाही. मातीचे ढीग हटविले नाहीत. त्यामुळे नागरिकांना चालणे मुश्किल होत आहे. तसेच वाहतूक कोंडीत देखील भर पडत आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे महापालिकेने रस्ते खोदाई करणारे ठेकेदार आणि खासगी कंपन्यांकडून रस्ते पूर्ववत करुन घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वीच खड्डे बुजविणे गरजेचे आहे. महापालिका अधिकारी व ठेकेदारांनी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचा दिलेला शब्द पाळला नाही तर कामे सुरू असलेल्या रस्त्यावर ठाण मांडून बसणार असा इशारा त्यांनी दिला आहे.”