रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे श्राद्ध आंदोलन
पिंपरी |महाईन्यूज|
संभाजी ब्रिगेडच्या वतीने विधिवत श्राद्ध घालत आंदोलनाद्वारे महाराष्ट्र शासनाविरोधात संताप व्यक्त करत निषेध नोंदविला. श्री श्री रविशंकर याच्यावर अद्यापही गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ थेरगाव येथील स्मशानभूमीत हे आंदोलन करण्यात आले. तसेच या बाबत निर्णय न झाल्यास भविष्यात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.
पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. या वेळी संघटक ज्ञानेश्वर लोभे, माऊली बोराटे, योगेश साळवी, महेश कांबळे, मराठा जोडो अभियानाचे प्रदेश अध्यक्ष नितीन जाधव आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपमानकारक लिखाण केले. तसेच आपल्या अधिकृत पेजवर व्हिडिओ बनवून छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर त्वरित कारवाई होणे गरजेचे होते. मात्र कारवाई झाली नाही. नव्याने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीकडून कारवाई होईल, अशी आशा अनेकांना होती. मात्र त्यांच्याकडूनही निराशाच पदरात पडली.
महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडलेला दिसत असल्याचे चित्र आहे. शासनाला जागे करण्यासाठी व श्री श्री रविशंकर यांच्यावर एक वर्ष होऊन देखील गुन्हा नोंदवला नसल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने हे श्राद्ध आंदोलन केले. भविष्यात या आंदोलनाची दखल घेऊन श्री श्री रविशंकर याच्यावर गुन्हा दाखल न केल्यास आणखी आंदोलने तीव्र करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी दिला आहे.