युती सरकारने उद्योगधंदे बंद पाडल्याने लाखो कामगार रस्त्यावर – अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/ajit-pawar.jpg)
हडपसर – ‘युती सरकारने राज्यातील उद्योगधंदे बंद पडल्याने लाखो कामगारांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. ठरावीक उद्योगपतींची कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ करायला यांच्याकडे पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जांसाठी नाही…कर्जमाफीचे खोटे दाखले देऊन सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूकच केली आहे. त्यामुळे ते विकासकामांविषयी काहीही न बोलता केवळ भारत आणि पाकिस्तानविषयीच बोलत आहेत. हे भाजप आणि शिवसेनेचे षडयंत्र मतदारांनी ओळखले पाहिजे. पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडणून देणे गरजेचे आहे,’ या शब्दांत अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
लोणी काळभोर येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. या वेळी पवार बोलत होते. देविदास भन्साळी, सुरेश घुले, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, अशोक पवार, जालिंदर कामठे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रदीप कंद आदी या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवती विभागाच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी भाजपवर टीका केला. ‘उच्च शिक्षितांवर चहा, वडापावची हातगाडी लावण्याची वेळ आली आहे. लाखो इंजिनीअर रस्त्यावर आले आहेत. आता खासगी शिवशाही बस आणून एसटी महामंडळ बंद करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. बीएसएनएल बंद पाडून जिओचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ अशी टीका पवार यांनी केली.