‘मनसे’च्या झेंड्यावर शिवराजमुद्रेचा उपयोग करू नये – मारुती भापकर
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा वापर करणार असल्याची माहिती समजते. याच राजमुत्रेचा वापर महाराष्ट्र शासन प्रशासकीय कामकाजासाठी करत आहे. त्यामुळे मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यावर शिवराजमुद्रेचा वापर करू नये, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केली आहे.
भापकर यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे तसेच भारताचे आराध्य दैवत आहेत. ते युगपुरुष आहेत. शिवरायांनी हिंदवी स्वराजाची स्थापना करताना रयतेच्या हितासाठी स्वतंत्र राजमुद्रा निर्माण केली. त्या राजमुद्रेचा वापर करूनच स्वराज्याचा कारभार होऊन त्यातूनच रयतेला अभिप्रेत असणारे लोककल्याणकारी रयतेचे राज्य निर्माण झाले. म्हणूनच शिवचरित्रात शिवराजमुद्रेला अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्र शासनदेखील याच राजमुद्रेचा प्रशासकीय कामकाजात प्रतिक म्हणून वापरत आहे.
मनसेचा वर्धापन दिन २३ जानेवारीला होत आहे. यावेळी पक्षाचा पूर्वीचा झेंडा बदलून त्या झेंड्यातील निळा व हिरवा रंग काढणार असल्याचे समजते. पक्षाचा झेंडा हा संपूर्ण भगवा रंग असणारा झेंडा असणार नाही. झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराजमुद्रा वापरली जाणार आहे, हे अत्यंत चुकीचे आहे, असे भापकर यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका जातीचे, धर्माचे, पंथाचे नसून ते युगपुरुष व संपूर्ण भारताची अस्मिता आहे. महाराज राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहेत. त्यांच्यावर सर्व जाती, धर्म, पंथ व सर्व विचारधारेच्या लोकांचा समान अधिकार आहे. मात्र, राजकीय पक्षाच्या ध्वजावर शिवराजमुद्रेचा वापर करणे अत्यंत चुकीचे आहे, असेही भापकर यांनी म्हटले आहे.
राजकीय पक्षाच्या अनेक कार्यक्रमात, आंदोलनात या ध्वचांचा मोठ्या प्रमाणत वापर होत असतो. त्यावेळी अनेक वेळा उत्साही कार्यकर्त्यांकडून शिवमुद्रा असणाऱ्या ध्वजाचा गैरवापर होऊ शकतो. या शिवमुद्रेचा अवमान होऊ शकतो. आपण शिवभक्त आहात. शिवचरित्राचे जाणकार आहात त्यामुळे आपण स्वतःहून आपल्या पक्षाच्या ध्वजावर शिवराजमुद्रेचा वापर करू नये, अशी मागणी भापकर यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना केली आहे.