भ्रष्टाचार लपविण्यासाठी स्थायी अध्यक्षा सीमा सावळे यांचा थैयथयाट
विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मी ९६ कुळी शेतकरी असून असून गाय, म्हैस, बैल, कुत्रा, मांजर ही जनावरे पाळण्याची आमची परंपरागत संस्कृती आहे. हे सर्व प्राणी आमच्या कुटूंबियांचे सदस्य म्हणून पाहतो. त्यांना पोटच्या पोरापेक्षा जास्त सांभाळतो. यामध्ये कुठलाही जातीचा उद्देश ठेवून मी हे वक्तव्य केलेले नाही, उलट ९६ कुळी या शब्दाबाबत राजकारण करुन भाजपा राजकीय हिन राजकारण करत आहे. मी सिमा सावळे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात मंजुर झालेल्या पंतप्रधान आवास योजनाच्या निविदेमध्ये झालेल्या भष्ट्राचाराच्या चौकशी मागणी केली आहे, तसेच कचरा संकलन निविदा, ४२५ कोटीचे रस्ते विकास योजना, वारक-यांसाठी ताडपत्री खरेदी, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आदी प्रकरणांमधिल गैरव्यवहार व भष्ट्राचारबाबत सत्ताधा-यांचे बुरखे फाडण्याचे काम मी केले आहे. ही भ्रष्टाचार प्रकरणे पचविण्यासाठी सिमा सावळे यांचा थैयथयाट चालू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.
दत्ता साने यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, यापूर्वीही जितेंद्र ननावरे व सिमा सावळे यांच्या वादग्रस्त सिडी प्रकरणात सिमा सावळे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोबाबत हिन जातीय राजकारण करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरली होती. हे शहरातील नागरीकांना माहितीच आहे. मतावर डोळा ठेवून असे हिन जातीय राजकारण करण्यात त्या माहिर आहेत. आज सुध्दा त्यांनी तोच केविलवाणा प्रयत्न केलाआहे. मी व माझा पक्ष काय विचाराने काम करतो हे जनतेला माहित आहे. व सिमा सावळे व त्यांचा पक्ष काय विचाराने काम करतो हे देखील शहरातील जनतेला सर्वश्रुत आहे.
आज जी कुत्र्याची पिल्ले महापालिकेत आणली होती, ती सहा महिन्याची होती. ते ज्या पिशवीत आणली त्या पिशवीला छिद्रे असल्यामुळे त्या पिशवीत हवा खेळती राहिल याची दक्षता घेतली होती. त्यांच्या जिविताला कोणताही धोका होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली होती. त्यांना सभागृहात आणण्यापूर्वी भरपेठ खाऊ पिऊ घातले होते. शहरात मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे शहरवासियांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक सर्व खबरदारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रतिकात्मक आदोलंनाचा कार्यक्रम आम्ही घेतला होता. माझ्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी सिमा सावळे यांनी सभागृहात केली त्याला कुठलाही आधार नव्हता. उलट शहरात स्वाईन फ्यु ने २० पेक्षा जास्त अधिक नागरीकांचे मुत्यू झाले आहेत. या मुत्यूला भाजपाचे सत्ताधारी पदाधिकारी, प्रशासन जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी पूर्वीच केली आहे व आता सुध्दा आम्ही करत आहोत असे साने यांनी म्हटले आहे.