भारत फोर्ज कंपनीतील कामगारांचे नियोजित उपोषण स्थगित
![Planned strike of Bharat Forge workers postponed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/श्रमिक-एकता.jpg)
प्रलंबित वेतनवाढीचा करार १५ दिवसात चर्चेद्वारे पूर्ण करण्याचे कंपनीचे आश्वासन
पिंपरी । प्रतिनिधी
17 महिने प्रलंबित वेतन करार पुर्ण करण्याच्या मागणीसाठी भारत फोर्ज कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी संतोष साबळे उपोषण करणार होते. मंगळवारी (दि. 5) पासून कंपनी प्रवेशद्वारा समोर हे उपोषण करण्यात येणार होते. सदर नियोजित उपोषणाची भारत फोर्ज व्यवस्थापनाने दखल घेतली असून प्रलंबित वेतनवाढीचा करार १५ दिवसात चर्चेद्वारे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच नियोजित उपोषण मागे घेण्याची विनंती केली. 2 जानेवारी 2021 रोजी व्यवस्थापनाने भारत फोर्ज कामगार संघाला पत्राद्वारे लेखी आश्वासन दिले. या वेळी नियोजित उपोषण स्थगित करत असल्याचे श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.
या बाबत महा ई न्यूजने सविस्तर वृत्त दिले होते. त्याची दखल कंपनी व्यवस्थापनाने घेत लेखी आश्वासन दिले.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, संघटनेने उपोषण हा विषय प्रतिष्ठेचा बनविला नाही. व्यवस्थापनाने दिलेले आश्वासन पाळले जाईल या अपेक्षेने नियोजित उपोषण तात्पुरते स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत 4 जानेवारी 2021 रोजीच्या पत्राने व्यवस्थापनास संघटनेने कळविले आहे. भारत फोर्ज कामगार संघाने घेतलेला वरील निर्णय हा कंपनी व कामगार तसेच औद्योगिक संबंध यांच्या व्यापक हितास प्राधान्य देणारा आहे. त्याचा आदर करून दिलेल्या आश्वासनानुसार 15 दिवसात प्रलंबित वेतन कराराबाबत चर्चेद्वारे समाधानकारक तोडगा काढणे आवश्यक आहे.
भारत फोर्जच्या चाकण कंपनीतील कामगारांचा वेतनवाढीचा करार १ एप्रिल 2018 पासून प्रलंबित आहे. त्यामध्येच 18 ऑगस्ट 2020 रोजी पासून 167 कामगारांना ले ऑफ देण्यात आला आहे. त्यांना मूळ पगार आणि महागाई भत्त्याच्या 50 टक्के इतका पगार दिला जातो आहे. त्यामुळे चाकण कंपनीतील कामगारांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. घरासाठीच्या कर्जाचे हप्ते व इतर कर्जाचे हप्ते यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत व्यवस्थापनाने संवेदनशील पणे या विषयाकडे पाहिले पाहिजे. त्यासाठी आंदोलनाची प्रतीक्षा करू नये. भारत फोर्ज एम्प्लॉईज युनियन चाकण यांच्या सोबत चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे. भारत फोर्ज व्यवस्थापनाने त्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. असे व्यवस्थापनास या निवेदनाद्वारे आवाहन केले.