भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडून 10 कोटी, स्थायीची मान्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/pcmc-46_201905234300.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणातील मंजूर पाणी कोटा आणण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला 10 कोटी अदा करण्यात येणार आहे. या विषय़ाला आज स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.
शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता भामा आसखेड धरणातील पाण्यासाठी पालिकेचा आग्रह होता. त्यासाठी पाठबंधारे विभागाकडून या धरणातील 60.790 दलघमी प्रतिदीन पाणी कोटा मंजूर झाला आहे. हे पाणी आणण्यासाठी शेतक-यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी 15 लाख प्रती हेक्टर दराने पुनर्वसन खर्चापोटी प्रकल्पग्रस्त शेतक-यांना अदा करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वीच 15 जून 2019 रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयाला 20 कोटी 875 लाख रुपये जमा केले आहेत.
पुणे जिल्हाधिकारी यांनी 8 ऑगस्ट 2019 रोजी आणखीन 10 कोटींची मागणी केली आहे. भामा आसखेड धरणातील पाणीसाठा आरक्षित करणे व अनुषंगीक कामे करण्यासाठी पालिकेच्या लेखाशीर्षावर 37 कोटी 50 लाख एवढी तरतूद उपलब्ध आहे. पाटबंधारे विभाग पुणे यांच्याकडील पत्रान्वये अनामत 33 लाख 52 हजार 610, जलमापक यंत्रासाठी 5 लाख 64 हजार 581 व जलमापक यंत्रासाठीची किंमत याप्रमाणे 15 टक्के अतिरिक्त कार्यालयीन खर्च 84 हजार 687 आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अशी एकूण 10 कोटी रुपये अदा करण्याचा निर्णय आजच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी होते.