भाजप, शिवसेना, ‘आरएसएस’ जातीय तेढ निर्माण करतायत; राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचा आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Jayant-Patil.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – लोकसभा निवडणुकीनिमित्त घराघरात येऊन भाजप विषारी प्रचार करेल. प्रत्येक घर पिंजून काढून अपप्रचार करण्याचं काम भाजप, शिवसेना, आरएसएस करणार आहे. जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतील. जे जाहीर बोलता येत नाही. ते खासगीत बोलण्याचं काम करतील. त्यामुळे तुम्ही सावध राहण्याचं काम करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मतदारांना केले आहे.
मावळ लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, शेकापचे जयंतराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, आरपीआय जोगेंद्र कवाडे गटाचे पदाधिकारी, नेते नाना काटे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
- पाटील म्हणाले की, आघाडीच्या काळात 51 लाख कोटी रुपयांचं कर्ज देशावर चढलं होतं. युतीच्या काळात 81 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा देशावर चढला आहे. एवढे पैसे कुठे गेले, या प्रश्नाचं उत्तर भाजपने द्यावं. मुळात सरकारच्या तिजोरीत आलेला पै आणि पै लोकसभा आणि विधानसभेत सांगायचा असतो. त्याचा हिशोब द्यायचा असतो. संसदेची परवानगी घेतल्याशिवाय सरकारला एक रुपया देखील खर्च करता येत नाही. असे असताना मागील एक वर्षाच्या कार्यकाळात 1 लाख कोटी रुपये सभागृहाला न दाखविता भाजप-शिवसेना सरकारने खर्च केले. आजपर्यंत लोकसभेमध्ये त्याचा हिशोब दिलेला नाही. ही माहिती सभागृहातील एका कॉम्प्युटर रिपोर्टमध्ये बाहेर आली आहे. त्यामुळे आपण कोणाच्या हातात देश दिला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आघाडीच्या कार्यकाळाच्या 60 वर्षामध्ये संस्थात्मक उभारण्या झाल्या. त्या मोडीत काढण्याचं काम मोदींनी केलं आहे. अहमदाबादमधून मुंबईला बुलेट होणार आहे. याचा तुम्हाला आम्हाला फायदा नाही. परंतु, गुजरातच्या व्यापा-यांचा विकास साधला जाणार आहे. अरे दादर स्टेशन येथे पडलेल्या पुलाचे काम तरी करता येते का तुम्हाला. कोणाच्या पाठीमागे काय दडलेलं आहे. हे आपल्या लक्षात यायला हवं. त्यामुळे येणा-या निवडणुकीत विचार करून मतदान करा, असे आवाहन पाटील यांनी केले.
- राज्यातील सगळ्या वंचित समाजाचा सरकारला पाठींबा मिळणार नाही. त्यांची मतं आघाडीला पडू लागली तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या लोकांना उभे करून ही मते वळविण्यासाठी भाजप आणि शिवसेना प्रयत्न करत आहे. या देशातल्या सर्व जातीधर्मातील लोकांना समान न्याय दिला पाहिजे. घराघरापर्यंत जाऊन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करा. मते खाण्यासाठी जर कोणी उभे राहत असेल तर त्यांना घरी बसवण्याचं काम तुम्ही करा, असेही आवाहन पाटील यांनी नागरिकांना केले.