बापाकडे बघून मुलाला मुलगी देत नाहीत; राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्याला टोला
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या निर्णयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी काैतूक केले. त्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली. त्यावर ते म्हणाले की, केंद्राचा टेंभा मिरवत मते मागण्याचा विचार सोडा. लग्नासाठी मुलीचा हात मागायला मुलगा गेला तर, त्याच्या बापाच्या कर्तृत्वावर कोणी मुलगी देत नाही. त्यासाठी मुलानं कर्तृत्व दाखवण्याची गरज असते, अशा शब्दांत कोल्हे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या निर्णयांमुळं राज्यात कशा प्रकारे गुंतवणूक वाढेल याबद्दलची माहिती दिली. तसंच मोदी आणि सीतारामन यांचे कौतुक केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. राष्ट्रवादीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर फडणवीस आणि खासदार अमोल कोल्हे यांचा एकत्रित व्हिडिओ पोस्ट केला आहे. फडणवीस हे पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे हे राज्य सरकारनं केलेल्या विकासकामांबाबत जाब विचारताना या व्हिडिओत दिसत आहेत. याशिवाय राष्ट्रवादीनं ट्विट करत फडणवीसांना टोला लगावला आहे.