प्राधिकरणातील बाधित शेतक-यांचा परतावा लवकरच – सदाशिव खाडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Sadashiv-Khade.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – वाल्हेकरवाडी आणि परिसरातील बाधित शेतक-यांना साडेबारा टक्के जमीन परतावा मिळण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पडत असून लवकरच त्याचा निर्णय लागेल, असा विश्वास पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी वाल्हेकरवाडी येथे व्यक्त केला.
- वाल्हेकरवाडी येथील लक्ष्मीनगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, पुणे जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एकनाथराव टिळे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेविका संगीता भोंडवे, नगरसेवक नामदेव ढाके, सुरेश भोईर, दिलीप काटे, सर्व संचालक आणि बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.
अध्यक्ष खाडे म्हणाले की, जमीन परताव्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. हे सर्व प्रश्न सुटणार आहेत. शेतक-यांच्या हक्काचा परतावा त्यांना मिळावा. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. येत्या अधिवेशनानंतर लागलीच हा प्रश्न मार्गी लागेल. वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
- काशिनाथ भोंडवे, बाळासो हुलावळे (सहकार मित्र पुरस्कार), सुरेखा पाटील, सविता अडसूळ (आदर्श माता), कल्याण खामकर, रोहिणी जोशी (आदर्श शिक्षक), सीताराम शिंदे (आदर्श सैनिक), अतुल क्षीरसागर (आदर्श पत्रकार) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर वाल्हेकर यांनी केले. सूत्रसंचालन सचिन वाल्हेकर यांनी केले. तर, आभार रवींद्र वाल्हेकर यांनी मानले.