पुण्यात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही – पालकमंत्री गिरीष बापट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG_20190426_151410.jpg)
- बंदिस्त जलवाहिनीचे काम पुर्ण करणारच
पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघात बारामतीसह बाहेरचे लोक आणून विरोधकांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा जनतेवर प्रभाव पडणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. बाहेरचे लोक आणल्याने दहशत निर्माण होत असते. एकाच आडनावाचा जनतेला कंटाळा आणि वीट आला आहे, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी पवार कुटूंबियावर केली. तसेच मतदारसंघात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज (शुक्रवारी) भाजप नगरसेवकांची पिंपरीत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, शिवसेनेचे संपर्कनेते बाळाभाई कदम, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत मावळाची जागा राखण्यात आम्ही यशस्वी होवू, महायुतीचा निश्चित विजयी होईल, असे विश्वास व्यक्त केला. तसेच पुणे जिल्ह्याचे अनेक वर्ष पवारांकडे नेतृत्व होते. सत्ता असताना त्यांनी विकास केला नाही. अण्णासाहेब मगर यांच्याप्रमाणे विचार करुन आम्ही विकास कामे करत आहोत. शेतक-यांशी चर्चा करुन पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावला जाईल.असेही बापट यांनी सांगितले.