पुण्यात कर्णबधिरांच्या मोर्चावर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Pune-Lathicharge.jpg)
पुणे – पोलिसांनी कर्णबधिरांच्या मोर्चावर लाठीचार्ज केल्याची घटना पुण्यात घडली आहे. कर्णबधिरांकडून पुण्यातील समाज कल्याण कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. पण पोलिसांकडून मोर्चा अडवण्यात आला आणि त्यांच्यावर लाठीचार्जला सुरुवात केली. शिवाय 60 ते 70 तरुणांना ताब्यातही घेण्यात आलंय.
पुण्यातील समाज कल्याण कार्यालयात जाऊन हे तरुण आणि तरुणी त्यांच्या मागण्या मांडणार होते. त्यानंतर मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचं पत्र दिलं जाणार होतं. त्याअगोदरच पोलिसांनी अडवणूक करत या दिव्यांगांवर अमानुषपणे लाठीचार्च केलाय. या मारहाणीमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
आम्ही शांततेच्या मार्गाने मोर्चा करत होतो, पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप या मोर्चेकऱ्यांनी केलाय. दिव्यांगांना पोलिसांकडून मारहाण केली जाऊ शकत नाही, तरीही पोलिसांनीच कायदा हातात घेत मारहाण केल्याचा आरोप दिव्यांगांनी केलाय. मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेऊन विविध ठिकाणी ठेवण्यात आलंय.
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन स्थळ सोडणार नाही, असा पवित्रा या मोर्चेकऱ्यांनी घेतला. जवान जसे देशासाठी शहीद होतात, तसे आम्हीही आमच्या मागण्यांसाठी प्राणाची आहुती देऊ, असंही मोर्चेकऱ्यांनी म्हटलंय. यापूर्वीही अनेकदा मागण्यांचा पाठपुरावा केला, पण अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जात नाही, असा आरोप मोर्चेकऱ्यांचा आहे.
या आहेत मागण्या ?
शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील मूक बधिरांच्या अनुशेष भरतीचा फेर आढावा घेवून पद भरती करण्यात यावी
दिव्यांगासाठी मोफत घरकुल देण्यात यावे
कर्ज योजना आणि बँकांकडून होणारी दिव्यांगाची अडवणूक थांबविण्यात यावी
मूक बधिरांना दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड देण्यात यावे
संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करून ते एक हजार रुपये करून मूक बधीर कुटुंब प्रमुखास दारिद्र्य रेषेचे कार्ड आणि घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा यासह इतर मागण्या