पिंपरी-चिंचवडकरांनो सावध व्हा, कोरोनाला आळा घाला : संजोग वाघेरे-पाटील
![Take necessary measures to prevent the risk of mucomycosis - Sanjog Waghere Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/sanjog-waghire.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
सण उत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढून दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा केंद्रीय समितीने दिला होता. तशीच परिस्थिती देशात, राज्यात व शहरात निर्माण होताना दिसत असून, कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत असून परिस्थिती पाहून पुन्हा टाळेबंदी होऊ शकते असा इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चिचवड येथील कार्यक्रमात दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीवर आज सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी येणारे संकट ओळखा आणि वेळीच जागे व्हा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी चिंचवडकरांना केले आहे.
वाघेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा फैलावला होता. तो नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार व पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. याचबरोबर कोरोनायोध्द्दा असणारे स्थानिक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही मोलाची कामगिरी बजावली. उलट नागरिकांनी याला फाटा देत मास्क न लावता फिरणे, सुरक्षित अंतरांचे निकष न पाळणे, वेळीच लक्षणे दिसताच तपासण्या न करणे अशा प्रकारांमुळे शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू शकतो, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.
मागील तीन दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची भीती खरी होताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येचे वाढणारे प्रमाण मोठे नसले तरीही शहरात ते कायम नियंत्रणात राहणे गरजेचे आहे. अनेक नागरिक कोरोना संसर्ग संपल्यासारखे सर्वत्र वावरत आहेत. दुचाकी व पायी चालणारे नागरिक मास्क न घालता फिरण्याचे प्रमाणही वाढले आहे. घराबाहेर जाऊन खरेदीला गर्दी केल्यामुळे कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. शहरातील डॉक्टरांकडे ताप, सर्दी, तीव्र डोकेदुखी तसेच अंगदुखी ही लक्षणे घेऊन आलेल्या रुग्णांचे प्रमाण हळूहळू वाढते आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनी सतर्क होण्याची गरज आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची पूर्वीइतकीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
दिवाळी उत्सवात नागरिक फिरायला, नातेवाईकांना भेटायला मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले, हे अत्यंत धोकादायक ठरू शकते. आपल्या सर्वांसाठी आगामी दोन महिन्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनो विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, बाजारात, दुकानात, मॉलमध्ये गर्दी करणे टाळा, घराबाहेर पडताना मास्कशिवाय बाहेर पडू नका, घरात लहान मुले असतील तर विशेष काळजी घ्या, असे आवाहन वाघेरे पाटील यांनी केले आहे.