निवडणुका आल्या की, भाजप-शिवसेना नेत्यांना राम आठवतो – अजित पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/IMG-20181103-WA0042.jpg)
अजित पवार यांची पत्रकार परिषदेत टिका
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सुक्ष्म, लघु, उद्योगाला 59 मिनिटात एक कोटींचे कर्ज देण्याची वचन देतात. हे कदापी शक्य नसून आगामी निवडणुकीसाठी भाजप नेत्यांचे हे गाजर आहे. एकदा का सत्ता हातात आली मग जाहिरपणे म्हणतात हा चुनावी जुमला होता, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधा-यांवर टिका केली. आता 25 तारखेला शिवसेनेचे नेते अयोध्येला निघालेत. निवडणुका जवळ आल्या की, भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांना राम आठवतो, असेही पवार म्हणाले.
शिवसेना भाजपावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका करतेय, तरी भाजप नेते शांत आहेत. त्यांना का प्रत्युत्तर दिले जात नाही. किंवा कारवाई का होत नाही. कारण, शिवसेनेशी युती केल्याशिवाय सत्ता आणले शक्य नसल्याचे भाजप नेत्यांना माहिती आहे. म्हणूनच सेनेच्या विरोधात बोलायला भाजपचा एकही नेता धजावत नाही. गुजरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बांधण्यामागे भाजपाचे राजकारण आहे. सरदार पटेल हे खरेतर काँग्रेसचे नेते होते. पोलादी व्यक्तीमत्व म्हणून त्यांना इंदिरा गांधी यांनी उपाधी दिली होती. त्यांचा पुतळा करण्याच्या पाठीमागे भाजपचे हीत लपले आहे. निवडणूक जवळ आल्यावर राममंदिराचा मुद्दा काढला. समाजात धृवीकरण करायचय. निवडणुका आल्या की शिवसेना, भाजपाला राम आठवतो, असेही पवार यांनी पिंपरीतील पत्रकार परिषदेत शनिवारी (दि. 3) सांगितले.
————
48 जागांपैकी तीन चतुर्थांश जागांवर आघाडीचं एकमत
काल मित्र पक्षासोबत बैठक झाली असून ४८ जागांपैकी तीन चतुर्थांश जागांवर आघाडीचं एकमत झालंय. समविचारी पक्षांना एकत्र घेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल काही बोलले असले, तरी आम्ही त्यांच्यासोबत पुन्हा चर्चेसाठी तयार आहोत. ज्या जागांवर एकमत झालंय, त्यापैकी काही जागा आम्ही मित्रपक्षांना देणार आहोत. मनसेला आघाडीत घेणार का? यावर समविचारी पक्ष एकत्र येतील असं सूचक विधान करत कालच्या बैठकीत मनसे बद्दल चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याने महाअघाडीत ते नसतील, असेही पवार म्हणाले.
—————-
भाजपचे नेते न्यायालयाला गुप्तता शिकवतात
हुकूमशाही पध्दतीने भाजपचा कारभार सुरू आहे. चंद्रकात पाटील म्हणतात पत्रकारांपेक्षा विरोधक बरे. राफेलबाबत सरकार कोर्टाला सांगतय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गुप्तता ठेवण्यात आलीय. म्हणजे हे कोर्टाला सुरक्षा शिकवणार. आज पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. त्यावर अजित पवार यांनी टीका केली.
———-
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणारच
मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे गाजर दाखवण्याचे काम. जे सत्तेला हपापले आहेत. त्यांना गाजर आहे. भाजप शिवसेनेची आघाडी झाली किंवा नाही, तरी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार. गेल्या वेळेस युती नसल्याने त्याची किंमत सर्वाना मोजावी लागली अशी व्यथाही अजित पवार यांनी व्यक्त केली.