निगडी चौकातील उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटर, वर्तुळाकार मार्ग प्रकल्प रखडला
- ठेकेदारावर महापालीका मेहरबान.
- ऊड्डाणपूलाच्या कामाची दिलेली मुदत संपली असतांना देखील काम पूर्ण झाले नाही ठेकेदारावर महापालीका मेहरबान? का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पिंपरी |महा ई न्यूज | पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटर, वर्तुळाकार मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुदत गुरुवारी (ता. २६) संपत आहे. आतापर्यंत केवळ ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.निगडी – भक्ती शक्ती उड्डाण पुलाच्या कामाची मुदत गुरुवारी संपत असून, काम मात्र अपूर्णावस्थेत आहे
परिणामी, स्थानिकांना सायंकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ९० कोटी ५३ लाख रुपये खर्चून या प्रकल्पाचे नियोजन केले आहे. महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला २६ जून २०१७ ला काम दिले. या कामाची मुदत ३० महिने म्हणजे २६ डिसेंबर २०१९ पर्यंत आहे.
आतापर्यंत केवळ निम्मे काम झाले आहे. यातील पुलाची लांबी एक किलोमीटर असून, १९ खांब आहेत. खांबांची सर्वाधिक उंची १२ मीटर आहे. ग्रेड सेपरेटर ७०० मीटर असून काही ठिकाणी सेगमेंट जुळवणी करून जोडरस्ता तयार करण्यात आला आहे. खांब नुकतेच उभारले असून, रस्त्यावर लोखंडी स्ट्रक्चर पडून आहेत. प्रकल्पाच्या कामाबाबत माहिती अधिकारात सतीश कदम यांना माहिती मिळाली आहे. दीड किलोमीटरचा वळसा संबंधित कंत्राटदाराने पंधरा दिवसांपूर्वी स्पाइन रस्त्याला समांतर ग्रेड सेपरेटर तयार करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे या कामास सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.
येथे ६० मीटर व्यासाचा वर्तुळाकार रस्ता तयार करण्यात येत आहे. त्याची तीन लेनच्या मार्गाची रुंदी १५.५ मीटर आहे. पण सध्या तो बंद केल्याने वळसा घेण्यासाठी एक ते दीड किलोमीटरपर्यंत जावे लागते. साईनगर-अंकुश चौक मार्गे भक्ती-शक्ती चौकाकडे येण्यासाठी वाहनचालकांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या असतात. ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्यामुळे एकच मार्ग सुरू असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर मुरूम, खड्डे पडले असून परिसरात धुळीचा त्रास होत आहे. शेजारीच बस टर्मिनल असल्याने कोंडीत भर पडत आहे.
एकूण खर्च
१८ कोटी १३ लाख सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचा खर्च ,७२ कोटी ४० लाख स्थापत्य विभाग ,९० कोटी ५३ लाख एकूण
सतीश कदम – “ऊड्डाणपुलाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आवस्थेत असुन नागरिकांना नाहक त्रासाला सामेरे जावे लागत आहे, मुदतीत काम न करणाऱ्या में बी.जी. शिर्के कंन्सट्रक्शन यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना काळ्यायादीत टाकावे या प्रकल्पा बाबत महापालीका प्रशासनाने बोटचेपी भुमिका घेतली असून याबाबत नीगरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे”.